10 लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे 960 कोटी रुपये मिळाले
कोल्हापूर (प्रतिनिधी) – गेल्या वर्षी 1 कोटी 44 हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज भरले होते. त्यामध्ये 53 लाख शेतकरी पात्र ठरवले गेले. तर 90 लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी हा विषय हाती घेतल्यानंतर शिवसेनेच्या दणक्याने 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेश क्षीरसागर म्हणाले, पीक विम्यासाठी शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. पीक विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी आलेला पैसा शेतकऱ्यांसाठीच वापर, या पैशातून विमा कंपन्यांचा फायदा होता कामा नये, असे सरकारला बजावले होते. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्याच्या प्रक्रियेला वेग आला. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज शिवसेनेकडे आले त्यापैकी बहुतेकांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळाली आहे.