मुंबई – राज्यामध्ये कोरोना विषाणू संकटाची परिस्थिती उद्भवल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत असा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने होताना दिसतोय. अशातच आज भाजप नेते निलेश राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एक नवा आरोप लगावलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकदा फोन केल्यानंतरही फोन स्वीकारत नाहीत आणि भेटतही नाहीत अशी तक्रार एका शिवसेना आमदाराने केल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
राणे यांनी याबाबत ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ‘एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येतं. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिक फाट्यावर.’ असा टोलाही लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांना 50 फोन करून सुद्धा फोन उचलत नाही आणि भेटत नाही अशी एका शिवसेना आमदाराची तक्रार. एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल ह्यावरून लक्षात येतं. फक्त भाषणातून सांगायचं शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिक फाट्यावर.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 7, 2020
दरम्यान, राणे यांच्या या ट्विटमुळे आता शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा एकदा पाहायला भेटतो की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.