पुणे – निवडणूकांमध्ये सोडून गेलेल्या आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा विधानसभेत दिसला नाही. असा सूचक इशारा देत, ‘इतिहासात काय घडलं, हे मी तुम्हाला सांगितलं,’ अशी मिश्कील टिप्पणीही राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राज्यात १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही तरुणांना संधी दिली. त्यामध्ये साठ उमेदवार निवडून आले. त्यानंतर काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो. तेथून परत आल्यावर साठ आमदारांपैकी केवळ सहा जण आमच्यासोबत शिल्लक राहिले. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांपैकी एकही आमदार पुन्हा विधानसभेत दिसला नाही,’ असा किस्सा सांगत शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या आमदारांना सूचक इशारा दिला.
यावेळी प्रफुल्ल पटेल पुस्तक एक पुस्तक लिहणार असून, त्यामध्ये या सर्व घटना लिहणार असल्याचे सांगितले. त्याबाबत शरद पवार म्हणाले, नक्कीच त्यांच्या पुस्तकाचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी त्या पुस्तकात लोक पक्ष सोडून का जातात, त्यांच्या घराचे किती मजले ‘इडी’च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते, ही प्रकरणेही लिहावीत. त्यातून ज्ञानात भर पडेल,’ असा टोलाही पवार यांनी लगावला. राष्ट्रवादीने भाजपसोबत जावे, असा पटेलांचा आग्रह होता. परंतु, मी नकार दिल्याने ते थांबले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्याची आठवण पवारांनी करून दिली.
“पहाटेचा शपथविधी हा पक्षाच्या धोरणाचा भाग नव्हता. परंतु, काही सहकाऱ्यांनी पक्षधोरणाशी विसंगत निर्णय घेतल्यावर तो दुरुस्त करण्याची तयारी दर्शविल्यास मोठ्यांनी मोठे मन दाखवायचे असते. ते दाखविले, मात्र पूर्वीच्या अनुभवातून काही शहाणपणाही स्वीकारायचा असतो.” – शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस