पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आळंदी येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं. जेष्ठ नेते शरद पवार हे आज विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आळंदी येथे उपस्थित होते. यावेळी इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण करावे अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. उपस्थितांच्या या मागणीवर बोलताना शरद पवार यांनी आपण केवळ इंद्रायणी नदी शुद्धीकरणाचे आश्वासन देणार नसून ते एक कर्तव्य म्हणून पार पाडणार असल्याचा शब्द दिला.
दरम्यान, इंद्रायणी शुद्धीकरणाबाबत बोलत असताना पवार यांनी काशी येथील घाटाचे उदाहरण दिले. ‘देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या श्रद्धेने भाविक काशी येथील घाटावर येत असतात. येथे एकदा भेटीस गेल्यानंतर अर्धवट जळालेली प्रेतं पाहायला मिळाली होती.’ अशी आठवण पवारांनी सांगितली. याबाबत पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती करत, “पंतप्रधानांनी तो घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. हे तिथे घडलं असेल तर इथे घडून आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.” असं वक्तव्य केलं.