वाल्हे- पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथील वीर, हरणी, मांडकी, पिंगोरी, कवडेवाडी आडाचीवाडी, तसेच वाल्हे गाव आदी गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. स्थानिक प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ, प्रवाशी, विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरून वाल्हे गावामधून वीर, तसेच हरणी, पिंगोरी, वाल्हे येथील रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषीची संजीवनी समाधी मंदिर, वाल्हे येथील भैरवनाथ मंदिर आदी धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातच साईडपट्टीच पूर्णपणे खचल्यामुळे रस्त्याची उंची जमीन पेक्षा अधिक होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र बॅंकेच्या समोरील रस्ता ते वीर फाटा या ठिकाणच्या रस्त्यावर डांबर व खडी रहिली नसून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा शनिवार (दि. 8) पासून सुरुवात होत असल्याने भाविकांना रस्त्याने जाताना-येताना मोठी कसरत करावी लागणार आहे.