नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल २५ मिनिटं चाललेल्या या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होत. अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत खुलासा केला आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा व संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा मुद्दा हे दोन मुद्दे वगळता राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पत्रकारपरिषदेत बोलताना पवार यांनी, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत देखील मोठं भाष्य केलं.
कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नसून महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष भाजपविरोधात एकत्र लढतील असं पवार यांनी स्पष्ट केलं. अशातच पत्रकारांनी शरद पवार यांना, राज्यात केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करेल. तसेच विधानसभेच्या पुढील पंचवार्षिक निवडणुकांमध्ये आम्ही (राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना) पुन्हा सत्तेत येऊ. असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईविरोधात परखड भूमिका मांडली. राऊत यांच्यावर झालेली ईडी कारवाई ही अयोग्य असल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा मांडल्याचेही सांगितले. यावर पत्रकारांनी पंतप्रधान मोदींनी याबाबत काय भाष्य केलं असा प्रश्न विचारला असता पवार यांनी, पंतप्रधानांनी नावावर प्रतिक्रिया दिली नाही, त्यांनी प्रतिक्रिया द्यावी हे अपेक्षितही नव्हते. मात्र पंतप्रधान याबाबत विचार करून योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्या या पत्रकारपरिषदेनंतर भाजप नेत्यांनी याबबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली हे नेमकं सांगता येणार नाही. पवार हे मुरब्बी राजकारणी असून ते बोलतात एक व करतात दुसरच असं दरेकर म्हणाले.