पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावरून आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावलाय.
‘राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली हे चांगले आहे. पण मला वाटते की, ज्यांच्या घरी दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’, असा टोला शरद पवरांनी लगावला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बिहार निवडणुक निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी शरद पवार यांनी, ‘आता बदल झाला नसला तरी हळूहळू बदलाची वाट दिसू लागली आहे.’ असा आशावाद व्यक्त केला. यावेळी त्यांनी, बिहार निवडणुकांबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीत निशाणा साधत, ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे’ असा टोला लगावला.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल ( Bihar Election Results 2020 ) आज जाहीर होणार असून मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप-जेडी(यु) प्रणित एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. असं असलं तरी अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई सुरु असल्याने मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हेच चित्र कायम राहील याबाबत खात्री देता येणार नाही.