मुंबई : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागावाटप निश्चित झाले असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढवतील. तर मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. त्याच बरोबर यंदा निवडणुकीत पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युतीच्या जागावाटपाबाबत अद्याप ताणाताणी कायम असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून त्यापार्श्वभूमीवर कॉंग्रेस राष्ट्रवादीने जागावाटपाची बोलणी पूर्ण करून आघाडी घेतली आहे. आघाडीच्या जागावाटपाची माहिती शरद पवार यांनी ट्विट करून दिली. काही मतदारसंघांची अदला बदला होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2014च्या निवडणुकीत दोन्ही कांग्रेस स्वतंत्रपणे लढल्या होत्या. त्यात कॉंग्रेसला 42 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपा 122 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपाच्या वळचणीला गेले असून काही जण शिवसेनेच्या आश्रयाला गेले आहेत.
भाजपा आणि शिवसेनेमध्ये अद्याप जागावाटपावरून चढाओढ सुरू आहे. सध्या आघाडीला तोंड देताना युतीला पर्याय नाही याची भारतीय जनता पक्षाका जाण आहे. मात्र, त्यासाठी किती जागांवर पाणी सोडायचे यावरून हे संबंध ताणले गेले आहेत. अपमानास्पद स्थितीत युती करायची नाही, असे आदेशच पक्षाचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे युती होणार की नाही याबाबत राजकीय निरीक्षकांत संभ्रम कायम आहे.