राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यात यावर्षी मार्चपासून सूर्यदेव आग ओकू लागला आहे. त्यामुळे राहू बेट परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. नदीत पाणी आहे. परंतु पिकाला पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. वीज उपलब्ध नाही असे नाही.
परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे ओव्हर लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पिके पाण्यावाचून होरपळून जात आहे. अनेक ठिकाणी सुविधा कमी पडत असल्याने महावितरणचे अधिकारी देखील हतबल होताना दिसत आहे.
राहू बेट परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज उपलब्ध होत असल्याने ट्रान्सफॉर्मर, पंप जळण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. महावितरण मागेल त्याला वीज जोड देण्यास तयार असताना अनेक आकडे बहाद्दर वीज चोरून वापरत आहेत. त्याचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसत आहे.
ओव्हर लोडींगमुळे एखादा ट्रान्सफॉर्मर जळल्यास त्याच्या शेजारच्या ट्रान्सफॉर्मरवर अनिधिकृतपणे आकडा टाकून वीज घेतली जाते. थोड्याच कालावधीत तो ट्रान्सफॉर्मर देखील ओव्हर लोडिंगमुळे जळतो. प्रामाणिक ग्राहकाला मोठे नुकसान सोसावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्मरची मागणी वाढते. पुरवठा कमी असतो. ट्रान्सफॉर्मर सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.