पौड, (वार्ताहर)- भूगाव, भुकूम ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. हे स्वच्छता अभियान भूगाव, भुकूममधील नागरिकांनी राबविले असून यामध्ये विशेषतः भूगावमधील विविध सोसायट्यांमधील सजग नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जलाशय हा दोन्ही गावांना पाणीपुरवठा करणारा जलाशय स्वच्छ राहिला पाहिजे, या हेतूने हे अभियान घेण्यात येत असल्याचे येथील स्वच्छता करणार्या नागरिकांनी सांगितले. दोन्ही गावांना एकेकाळी हा तलाव पिण्याचे पाणी पुरवत होता.
कालांतराने परिसरात नागरिकरण वाढले आणि तलाव अस्वच्छ झाला. तलावाच्या कडेला दररोज संध्याकाळी अनेक दारू पिणारे लोक या ठिकाणी येऊन दारू पीत बसतात आणि बाटल्या प्लॅस्टिकचे ग्लास पत्रावळ्या त्याच ठिकाणी फेकून जातात यामुळे परिसर अस्वच्छ होत आहे. त्याचप्रमाणे अनेक नागरिक जाता येता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कचरा भरून टाकत असतात यामुळे परिसर अस्वच्छ झालेला आहे आत्तापर्यंत शेकडो टन कचरा येथील नागरिकांनी गोळा करून पाठविला आहे.
जोपर्यंत संपूर्ण तलावाचा परिसर स्वच्छ होत नाही तोपर्यंत हे स्वच्छता अभियान सुरू राहणार असल्याचे येथील स्वच्छता करणार्या नागरिकांनी सांगितले. यामध्ये इंडस इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी तसेच रवी पांडी, कृणाल घारे, किरकटवाडी येथील पर्यावरण कार्यकर्ता बापू हगवणे हे विशेष करून उपस्थित होते.
या स्वच्छता अभियानामध्ये लहान मुलांसहित महिला वृद्ध तरुण-तरुणी असे शंभरच्या पेक्षा जास्त नागरिक सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराज जलाशय हा संपूर्णपणे स्वच्छ करणे आणि त्या परिसरात कायम स्वच्छता ठेवणे हा या मागचा उद्देश आहे असे स्वच्छता अभियान करणार्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गाळ काढल्यास पाणीसाठा वाढणार
या तलावातील साठलेला अतिरिक्त गाळ काढणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावांमधील पाण्याची साठवणूक क्षमता वाढून पुढील वर्षी पाणीटंचाई होणार नाही, अशी मागणी या सर्व नागरिकांनी केली. याकडे दोन्ही ग्रामपंचायतींनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून माती काढण्याचे काम करणे गरजेचे आहे.