वाघोली ग्रामपंचायतीची तहसीलदारांकडे लेखी मागणी
वाघोली : वाघोली परिसरामध्ये राहणाऱ्या जवळपास सात हजार स्थलांतरित व गरजू मजुरांना अन्नधान्य मिळावे अशी मागणी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने हवेली तहसीलदारांकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. रेशनिंगचे धान्य मिळत नाही आणि शासकीय कार्यालयासमोर अन्न धान्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याने ग्रामपंचायतीने मागणी केली आहे.
वाघोली परिसरातील लोकसंख्येचा विचार केला असता वाघोली परिसरामध्ये हजारो हातावर पोट असणाऱ्या मजुरांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. लॉकडाऊन कालावधी वाढल्याने व रेशनिंग दुकानात धान्य नसल्याने असंख्य नागरीक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, रेशनिंग दुकानांच्या बाहेर अन्न धान्यासाठी विचारपूस करण्यासाठी गर्दी करीत आहेत. वाघोली परिसरात चार कोरोनाचे रुग्ण सापडल्याने दानशूर व्यक्ती, वाघोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने देण्यात येणारे दोन वेळचे जेवण बंद झाले आहे. शरद भोजन योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम सुरु आहे. मजूर कुटुंबांमध्ये चलबिचल सुरु झाल्याने सात हजार कुटुंबांसाठी एक महिना पुरेल एवढे अन्न धान्य वाटप करावे, असे लेखी पत्र वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.
वाघोली गावातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असून उपासमारीची समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली