सातारा – प्राथमिक शिक्षक बॅंकेत काही लोकांची एकाधिकारशाही सुरु असून बॅंकेत गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार झाला आहे. कधी नव्हे एवढी बॅंकेची बदनामी झाल्याने सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड चीड आहे. या निवडणुकीत सूज्ञ सभासद बॅंकेतील स्वार्थी प्रवृत्तींना घरचा रस्ता दाखवतील, असा विश्वास शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान प्राथमिक शिक्षक बॅंकेत सभासद परिवर्तन पॅनेलची सत्ता येणार हे निश्चित असून सत्तेवर येताच बॅंक डिजीटल करण्यावर आमचा भर राहील असेही ते म्हणाले.
जावळी तालुक्यातील सभासद परिवर्तन पॅनेलचे अधिकृत उमेदवार शामराव जुनघरे यांच्या मेढा येथील प्रचार सांगता सभेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, दीपक भुजबळ, बा. रा. गायकवाड, आ. को. मस्कर,प्रदीप कदम, शंकरराव देवरे, विठ्ठल फडतरे, सतीश नलवडे, सुरेंद्र घाडगे, संजय साठे, विनायक चव्हाण, अरुण पाटील, सुरेश चिकणे, गजानन वारागडे, विजय बांदल, माजी संचालक द. म. पार्टे, नारायण शिंगटे, इतर मागास प्रवर्गातील उमेदवार किरण यादव, पृथ्वीराज निकम, जितेंद्र जाधव, नेताजी जगताप, सुरेश पार्टे, रामदास गोळे आदी उपस्थित होते.
उदय शिंदे म्हणाले, शिक्षक बॅंकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात सत्ताधाऱ्यांबद्दल पहिल्यांदाच एवढी नाराजी सभासदांमधून दिसून येत आहे. सभासदांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन काहींना बॅंकेचे कुरण केले होते. भरमसाठ व्याजदरामुळे सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी आहे. या निवडुणकीच्या प्रचारात सुरुवातीपासून सभासद परिवर्तन पॅनेलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
हा प्रतिसाद पाहून सत्ताधाऱ्यांचे अवसान गळाले आहे. निवडणुकीचा कल पाहून अनेक सभासदांचा परिवर्तन पॅनेलला पाठिंबा मिळत आहे. प्राथमिक शिक्षक बॅंक ही शिक्षकांची शिक्षित लोकांची बॅंक असूनही बॅंकेची डिजिटल अवस्था खूप भयावह आहे. बॅंकेत प्रचंड प्रमाणात कर्मचारी असताना त्यांचा बॅंकेसाठी चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेण्याकरिता त्यांच्याकडून डिजिटल सेवा सभासदाला मिळावी म्हणून प्रयत्नशील राहणार आहे.
विश्वंभर रणनवरे म्हणाले, जावळी हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला असून कोणी काहीही म्हणाले तरी हा बालेकिल्ला अभेद्य राहणार आहे.जिल्ह्यातील सर्व उमेदवार मताधिक्क्याने विजयी होवून बॅंकेवर परिवर्तन पॅनेलची सत्ता येणार आहे. सभासदांनी गेल्या चार वर्षातील कारभारावर नजर मारल्यास सत्ताधाऱ्यांना मतदान करण्याची त्यांची इच्छा होईल असे वाटत नाही. शामराव जुनघरे यांनी प्रास्ताविक केले.