वेल्हे तालुक्यात भात कापणीसाठी लगबग : शेतकरी सुखावला
वेल्हे : भात शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या व सुवासिक इंद्रायणी तांदळासाठी संपूर्ण राज्यच नाही तर देश- विदेशामध्ये ओळख असलेल्या वेल्हे तालुक्यामध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पैसा हातात येणार असल्यामुळे तालुक्यातील अर्थकारणाला गती येणार आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
तालुक्यामध्ये या अगोदर पारंपारिक पद्धतीने विविध जातीचे तांदळाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, काही वर्षापासून मागणी असलेल्या इंद्रायणी तांदळाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. तांदळाला सर्वत्र मोठी मागणी असते. सध्या भात लागवड, कापणी, मळणी व भात भरडणे ते बाजारात विक्री करणे यासाठी जुन्या पारंपारिक पद्धतीचा वापर केला जात होता. मात्र, सध्या आधुनिक यंत्राचा वापर, विक्रीच्या पद्धती, मिळणारे उत्पन्न यावर शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग अवलंबले आहेत.
शेती करायची म्हणजे त्यासाठी मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. परंतु सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे यंत्रसामग्री वापरणे गरजेचे झाले असले तरी इंधन दरवाढीमुळे खर्चही वाढला आहे. यामुळे अपेक्षित आर्थिक लाभ होत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
ग्राहकांना स्वस्त दरामध्ये तांदूळ मिळणे अपेक्षित असते. परंतु लागवडीपासून ते विक्रीपर्यंत खर्च जर पाहिला तर तोच तांदूळ ग्राहकांना स्वस्त दरात विकणे शक्य नाही. वर्षभर घेतलेली मेहनत पाहता ग्राहकांनी यातून शेतकऱ्याला कोणता लाभ होतो, याचा विचार व्हावा.
– भिकामामा वालगुडे, शेतकरी, मार्गासनी.
ग्राहक शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करताना 100 वेळा विचार करतो. परंतु तोच ग्राहक व्यापाऱ्यांकडून भेसळ केलेला तांदूळ बिनधास्तपणे खरेदी करतो. उत्पादन खर्चापेक्षा स्वस्तात मिळालेली वस्तू दर्जेदार कशी असू शकते, हेच अजून ग्राहकांना कळले नाही.
– बाळू लक्ष्मण शिंदे, शेतकरी, केळद.
ग्राहक हा भाताची चव पाहत नाही. तो फक्त चिकट भात म्हणजे इंद्रायणी भात हेच समजतो. मात्र, हे सर्व खोटे आहे. इंद्रायणीला वेगळा सुगंध व चव आहे, हे बहुतांशी लोकांना माहीत नाही. याचाच फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यावसायिक घेत आहेत हे दुर्दैव आहे.
– सीताराम रसाळ, गुंजवणे.