शरद पवार : राज्यात परिवर्तनासाठी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा
पाटण – पाटण तालुक्यात कारखानदारी शाप असून ज्यांच्याकडे कारखाना, आमदारकी व पक्षाची सत्ता आहे, अशा लोकांना पाटण तालुक्यात काही करता आले नाही, हे दुर्दैवी आहे. विद्यमान आमदारांनी केवळ घोषणा केल्या, मात्र पूर्तता केली नाही. त्यामुळे पाटण तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभा करण्याची धमक केवळ सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मल्हारपेठ (ता. पाटण) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील उमेदवार श्रीनिवास पाटील व पाटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, डॉ. इंद्रजित मोहिते, आमदार शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, “”राज्यात ज्यावेळी परिवर्तन झाले. त्यावेळी पाटण तालुक्याने आपली जबाबदारी निभावली आहे. विधानसभा व सातारा लोकसभेचे पोटनिवडणूक अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे.
यासाठी आपल्याला या निवडणुकीत सत्ता परिवर्तन करायचे आहे. दुर्गम डोंगर असणाऱ्या पाटण तालुक्याला दिशा देण्याचे काम विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत कोणतीही दूरदृष्टी नसलेले नेतृत्व तसेच काम करण्याची इच्छा नसलेले नेतृत्व या तालुक्याचे नेतृत्व करत आहे.” त्यामुळे गेल्या पाच वर्षांत पाटण तालुका 25 वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्यजित पाटणकर यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. सत्यजित पाटणकर निर्व्यसनी आहेत, त्यांना ब्लडप्रेशरचा कोणताही त्रास नाही.
त्यामुळे ते तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाण्यामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला. मात्र तालुक्यात शेतीला पाणी मिळत नाही. पाटण तालुक्याला 24 तास वीज उपलब्ध करण्यासाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. मात्र, विजेचा प्रश्न मिटला नाही. तालुक्याची सत्ता, आमदारकी, कारखानदारी तसेच राज्यात सत्तेत असताना तालुक्याचा विकास करता आला नाही, असाही आरोप पवार यांनी देसाई यांच्यावर केला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “”सध्या राज्यात मोदी व शहा यांच्या सभा सर्वत्र होत आहेत. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नाही. रुपये लोकांना देऊन माणसे विकत आणावी लागत आहेत. महाराष्ट्रात राज्यात जाहिरातीपेक्षा लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, काश्मीरमधल्या 370 कलमाचा डांगोरा मोदी, शहा यांच्याकडून पिटला जात आहे. सत्ता असताना राज्यात काय दिवे लावले.
शेतकरी उध्दवस्त करण्याचे काम या सरकारने राज्यासह देशात केले आहे. पाटण तालुक्यातही या सरकारने कोणताही विकास केला नाही. कराड- चिपळूण रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाचे पैसे भाजप सरकारने बुलेट ट्रेनकडे वळवले. उद्योग क्षेत्रात पूर्णपणे मंदीचे सावट आहे.” केवळ जाहिरातबाजी करून हे सरकार देशाची अर्थव्यवस्था धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
तालुक्यात विद्यमान आमदारांना कोणताही प्रकल्प राबवता आला नाही. बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. त्यामुळे तालुका उध्वस्त करण्याचे काम आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे. स्वतःच्या ताब्यात असणारा कारखाना शंभूराज देसाई यांना सांभाळता येत नाही. कारखान्याची जबाबदारी त्यांना पेलवत नाही. त्यामुळे विद्यमान आमदारांना यावेळी आमदारकीच्या जबाबदारीतून जनतेने मुक्त करावे. व सत्यजीत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर चौफेर टीका केली. तालुक्यात शंभूराज यांनी केवळ पोकळ घोषणाबाजी करण्याचे काम केले आहे. तालुक्यात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी विकासाचा डोंगर उभा केला. मात्र, देसाई अठराशे कोटीचा विकास केल्याच्या थापा मारत आहेत. तालुक्यात जनतेला हा विकास दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. रोजगार निर्मितीसाठी तालुक्यात आपण साखर कारखान्याची निर्मिती करत आहोत. कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रश्नही मिटणार असून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देता येणार आहे. पाटण तालुक्यात भविष्यात ही रोजगारनिर्मितीला चालना देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.