सातारा -कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे राज्यात सर्वच ठिकाणी उन्हाचे चटके वाढले असून सातारा जिल्हयात कमाल तापमान चाळीशीपार गेल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढला असून या वैशाख वणव्यात आणखी तापमान वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
किमान तापमानातही सर्वच ठिकाणी वाढ झाल्याने रात्री उकाडा जाणवतो आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात झपाटयाने वाढ होत आहे. मंगळवारी साताऱ्यात चक्कचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मेच्या उन्हाचा तडाखा काय असतो, याची प्रचिती सातारकरांना घरात बसून येऊ लागली आहे.
एक तर कंटेनमेंट झोनमुळे अत्यावश्यक सुविधांची अडचण, त्यात विजेचा लंपडाव यामुळे उन्हाळ्यात थंड पेये व ज्यूस, आईस्क्रिमचा गारवा आता सातारकरांसाठी स्वप्न ठरले आहे. त्यामुळे त्याला पर्याय आमरसामध्ये शोधला जात आहे. मात्र, आंब्याचे दरही परवडणारे नसल्यामुळे अडचणीचे ठरत आहे.
राज्यात मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर कमाल तापमानात वाढ सुरू झाली. रविवारच्या ( 3 मे) तुलनेत राज्यात सोमवारी ( 4 मे) एकाच दिवसात
कमाल आणि किमान तापमानात मोठया प्रमाणावर वाढ नोंदविली गेली.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयासह कोकण विभागातही आता उन्हाच्या झळा आणि उकाड्यात वाढ झाली आहे. साताऱ्यासह, मराठवाडा विदर्भ व कोकणासह पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. येत्या दोन दिवसांत हे तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा इशारा “आयएमडी’च्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
आधी पाऊस मग उकाडा
अचानक वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी गेल्या आठवड्यात सायंकाळी गारांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा शहरासह कराड परिसरातही पावसाच्या काही सरी कोसळल्या. सांगली जिल्ह्यातदेखील पावसाने हजेरी लावली. गेले चार दिवस दिवसाच्या कमाल तपमानात वाढ होत असून मंगळवारी दुपारी तापमान 40.3 अंशांपर्यंत पोचले होते. मात्र, ढगाळ हवामान आणि हवेतील आर्दता यामुळे तापमान याहून जास्त असल्यासारखे जाणवत होते. त्यामुळे वातावरणात रखरख वाढून उष्म्यात भर पडली आहे.