राजगुरूनगर -शहरात पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या दारूच्या दुकानासमोर दारू खरेदीसाठी सोशल डिस्टन्स न पाळता तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दारू विक्रीस सोमवर (दि. 4) पासून परवानी मिळाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यातील तळीरामांनी सोमवारी सकाळपासून मिळेल त्या वाहनाने खेडमध्ये येत दुकानासमोर रांगा लावल्या होत्या; मात्र दुकान न उघडल्याने त्यांची घोर निराशा झाली होती.
पण, मंगळवार (दि. 5) पासून दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असल्याचे वृत्त बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यान त्याची कात्रणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मंगळवारी दारू दुकानांमध्ये तळीरामांनी मोठी गर्दी केली होती.
दुकानांमध्ये गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे लक्षात येताच दुकानदाराने चक्क दोरी बांधून तीन रांगा करून सोशल डिस्टन्स पाळला तरच दारू विक्री होईल, अशी भूमिका घेतल्याने तळीराम शुद्धीवर येत त्यांनी सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी केली.
…अन् पती-पत्नीच्या कलहाची ठिणगी
राजगुरूनगर शहरात मंगळवारपासून दारू विक्रीला सुरुवात होताच पती-पत्नीमधील कलह वाढून त्यांची भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत आली आहेत. एकीकडे महसूल नादात सरकार घराघरात भांडणे लावण्याचे काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया एक पीडित महिलेने व्यक्त केली आहे. दारू बंदी योग्य निर्णय होता. दारू विक्री सुरू झाल्याने तालुक्यात पुन्हा अशांतता प्रस्थापित होऊन गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.