सातारा – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा नगरपालिकेने किराणा साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. त्यापाठोपाठ आता भाजीपाला व औषधेही नागरिकांना घरबसल्या उपलब्ध केली जाणार आहेत. शहरातील 281 मेडिकल्स व 12 भाजी विक्रेत्यांनी यासाठी सकारात्मकता दर्शवल्याने बाजारपेठेतील गर्दीही आता नियंत्रणात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक तत्परतेने कामाला लागली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडूनही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईड या जंतुनाशक औषधाची फवारणी केली जात आहे. शिवाय विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये “करोना’बाबत प्रबोधनही केले जात आहे.
संचारबंदी लागू असूनही अनेक नागरिक भाजी व किराणा माल खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने शहरात ठिकठिकाणी सुरक्षित अंतराचे पट्टे आखले आहेत. संबंधित विक्रेते व ग्राहक याच ठिकाणी खरेदी विक्री करीत आहेत. शिवाय किराणा दुकानदार व मेडिकल दुकान चालकांनीदेखील दुकानाबाहेर असे पट्टे आखले असून ग्राहकांना “सोशल डिस्टन्सिंग’ सेवा पुरविली जात आहे.
ही गर्दी आणखी कमी व्हावी, यासाठी पालिकेने भाजीपाला व औषधेदेखील घरपोच देण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. शहरातील 12 भाजीविक्रेते व 281 मेडिकल दुकानचालकांशी पालिकेने चर्चा केली असून, याकामी सर्वांनी सकारात्मकता दर्शविली आहे. नागरिकांना औषध हवे असल्यास त्याची ऑडॅर फोनद्वारे द्यावी लागणार आहे. तसेच औषधाचे पैसे ऑनलाईन पाठवावे लागणार आहेत. भाजीविक्रेतेदेखील प्रत्येक प्रभागात गरजेनुसार भाजी विक्री करणार आहेत. भाजी विक्रेता व मेडिकल दुकानचालकाचे नाव तसेच त्यांचा मोबाईल नंबर प्रसिद्ध केला जाणार आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरात बसूनच अत्यावश्यक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.