जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : लॉकडाउन पाळण्याचे आदेश : ओळखपत्र बाळगा…
पुणे – लॉकडाउनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अजूनही 10 ते 15 टक्के लोक विनाकरण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या नागरिकांना अजूनही परिस्थितीचे गांभीर्य कळलेले दिसत नाही. लॉकडाउनचा अर्थ समजून घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका. तसेच अनावश्यक गर्दी करू नका. भाजीपाला अथवा किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळा. या सूचना पाळल्या नाहीत, तर उद्या परिस्थिती गंभीर होईल. आणि त्यावर कोणाचेच नियंत्रण राहणार नाही, अशा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. त्यामुळे या 21 दिवसांत घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे जिल्ह्यात अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरू आहे. याकाळात औषध, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी तीन फुटांचे अंतर ठेवावे.
रस्त्यावरील वाहतूक 2 ते 5 टक्के आहे. गर्दी कमी आहे. मात्र, विनाकारण सकाळ- संध्याकाळी घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत. करोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतः साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे, व प्रशासनाला सहकार्य करावे.
बॅंक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांनी प्रवास करताना फक्त आपले ओळखपत्र बरोबर ठेवावे, पोलीस त्यांना अडवणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
फूड पॅकेट वितरणाची परवानगी मिळणार
काही सामाजिक संस्थांनी फूड पॅकेट वितरणासाठी परवानगी मागितली आहे. त्यांना ती मिळणार आहे. मात्र त्याठिकाणी किती लोक काम करणार आहे, किती लोकांना अन्न देणार याची माहिती संबंधितांना द्यावी लागणार आहे. फूड पॅकेट देण्याचा ठिकाणी गर्दी होणार नाही, तसेच याठिकाणी सोशल डिस्टन्स राखणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
शासन आदेशाचे पालन आवश्यक
पुढील 10 ते 12 दिवसांत जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर आपण त्यामधून बाहेर पडलो आहे, असे समजण्याचे कारण नाही. आम्ही पूर्ववत कामे सुरू करू शकतो. 21 दिवस किंवा शासन सांगेपर्यंत आपल्याला आदेशाचे पालन करायचे आहे. शासन दिवस-रात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, जो पर्यंत नागरिकांचे सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.