नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून स्वागत केले आहे.
भारतात करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे संपूर्ण जनजीवन बंदिस्त झालं आहे. असंघटित आणि दररोज काम करून उदरर्निवाह चालवणाऱ्यांचा प्रश्न उपस्थित होत होता. त्यांच्यासह देशातील सर्वच घटकांसाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय राज्यअर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरूवारी केली.
अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषदेत झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून सरकारचं कौतुक केलं. सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आर्थिक पॅकेज हे योग्य दिशेनं टाकण्यात आलेलं पहिलं पाऊल आहे. लॉकडाउनचा फटका सहन करणाऱ्या शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजुर, कामगार, महिला आणि वयोवृद्ध व्यक्तीचं भारतावर ऋण आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.