सातारा – चर्मकार समाजातील ज्या लोकांनी उद्योग, व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. मात्र, करोनामुळे उद्योग, व्यवसाय डबघाईला आल्याने ते कर्जाचे हप्तेही भरु शकले नव्हते. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चर्मकार आघाडीने थकीत कर्ज माफ करण्याबाबत केलेली मागणी नुकतीच मान्य करण्यात आली असून ज्यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून कर्ज घेतले होते त्यांची कर्ज माफ होणार असल्याची माहिती चर्मकार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश रावखंडे यांनी दिली.
याबाबत त्यांनी सांगितले की, मुंबई येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या मिटींगमध्ये जे थकीत कर्ज आहे ते कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक धम्मज्योती गजभिये यांनी दिले आहे. तसेच पूर्वी पन्नास हजार कर्जाची मर्यादा ही आता दोन लाख केलेली आहे. पन्नास हजारासाठी एक सरकारी नोकर व एक शेतकरी असे जामीनदार आवश्यक होते.
ती जाचक अट शिथील करून आता रूपये पन्नास हजाराची मर्यादा वाढवून ती दोन लाख पर्यंत केलेली आहे. तसेच त्यासाठी जामिनाचीही अट शिथील केली जाईल अशी ग्वाही गजभिये यांनी दिली आहे.
चर्मकार समाजाच्या या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांनी संबंधीत विभागास आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे या बैठकीत आरपीआय (आ) चर्मकार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश रावखंडे, आरपीआय (आ) मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आण्णा वायदंडे, महाराष्ट्र सचिव रघुनाथ बाबर, चर्मकार आघाडीचे सचिव सचिन सुतार, सुरेश गडकरी, संजय मस्के यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील ज्यांचे थकीत कर्ज आहे त्यांनी सतीश रावखंडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
चर्मकार समाजाचा लवकरच महामेळावा
पुढील महिन्यांत केंद्रीय मंत्री रामदास आठवल तसेच संत रोहिदास चर्मकार महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक धम्मज्योती गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्मकार समाजाचा सातारा येथे महामेळावा आयोजित केलेला आहे. त्यामध्ये कर्जासाठी गरजू, लाभार्थी शोधून काढणे, त्यांना उद्योग धंद्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांना वित्तीयपुरवठा करणे (कर्ज देणे), मार्गदर्शन करणे, तसेच समाजातील इतर अडीअडचणी संदर्भात मार्गदर्शन करणेत येणार आहे.