पुणे – पुण्यात नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले नोकरदार तसेच शिक्षणासाठी राहणारे विद्यार्थी दिवाळी सणासाठी जवळपास आठ-दहा दिवस गावी गेल्याने पाणी मागणी कमी होऊन जलवाहिनीच्या शेवटच्या भागापर्यंत (टेलएंड) पूर्ण दाबाने भरपूर पाणी गेल्याने अशा भागांतील नागरिकांना सणासुदीत पूर्ण दाबाने तसेच मुबलक पाणी मिळाल्याने दि. 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत पाण्यासंदर्भात अवघ्या सात तक्रारी महापालिकेकडे आल्या.
विशेष म्हणजे “दिवाळीच्या सुट्टी’च्या कालावधीत दररोज 25 ते 30 एमएलडी पाण्याची बचत झाली. पालिकेकडून शहरासाठी दररोज 1700 ते 1750 एमएलडी पाणी पुरविले जाते. टेकड्यांच्या भागात व चढावरील परिसरात पालिकेने जलवाहिन्या टाकल्या असल्या तरी पाण्याच्या टाक्यांची संख्या पुरेशी नसल्याने अशा भागात टप्प्या टप्प्याने पाणी द्यावे लागते.
परंतु, शहराच्या बहुतांशी भागातील नागरिक सणासाठी गावी गेल्याने पाण्याची मागणी कमी झाल्याने जलवाहिनीच्या शेवटच्या भागापर्यंत मुबलक, पुरेशा दाबाने पाणी गेले. सोमवार पेठ, पुणे स्टेशन, कात्रज-कोंढवा रस्ता, हडपसर, कोंढवा, महंमदवाडी, काळेपडळ, मांजरी यासह “टेलएंड’च्या भागातून कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्या नाहीत. पालिकेकडे आलेल्या सात तक्रारीही नव्याने समाविष्ट गावांमधील आहेत.
आकडे सांगतात…
- दैनंदिन पाण्याची मागणी 1700 ते 1750 एमएलडी
- दिवाळीतील पाणी वापर 1700 ते 1720 एमएलडी
- बचत झालेले पाणी दररोज 25 ते 30 एमएलडी (सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पुरेल एवढे)
“दिवाळीच्या काळात पाणी पुरवठा विभागाने पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा केलेला, तरीही शहरातील एकूणच पाण्याची मागणी 20 ते 25 एमएलडीने कमी होती. जलवाहिनीतील पाणी शेवटच्या भागापर्यंत (टेलएंड) पोहचत असल्याने तेथून तक्रारी आल्या नाहीत.” – नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग
- नियमीत पुरवठ्यातून दररोज 25 ते 30 एमएलडी पाणी शिल्लक
- जलवाहिन्यांच्या “टेलएंड’ परिसराला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा
- पाणी पुरवठा विभागाकडे 10 दिवसांत 7 तक्रारी