विराज शिंदे; निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप
वाई – पांडे गावच्या हद्दीत धोम धरणाच्या डाव्या कालव्याला रात्रीच्या वेळेत भगदाड पडल्याने 150 उसतोड कामगारांचा जीव टांगणीला लागलेला होता. मात्र, ओझर्डे गावांतील तरुणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा व जनावरांचा जीव वाचला. डाव्या कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे गेली दोन महिने शेतीचा व पिण्याच्या प्रश्न जटील झालाय. मात्र, पाटबंधारे खात्यावर दबाव आणून स्वतः च्या भावाला फुटलेल्या बंधार्यांचे काम पदरात पाडून घेतले. त्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे करून भ्रष्ठाचार केला. जननायक म्हणवून घेणार्या लोकनेत्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. कारण येणार्या निवडणुकीत त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हा युवाध्यक्ष विराज शिंदे यांनी केली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेली दोन महिने रब्बी हंगामातील पिके पाण्याविना वाळून गेली आहेत. संपूर्ण हंगाम वाया गेला असून त्याच्या नुकसानीला जबाबदार कोण..? कालव्याच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याने एका दिवसातच बांधकामाला भेगा पडल्या. संबंधित पाटबंधारे खात्याने फक्त ट्रायल घेतल्याने पुढचा अनर्थ टळला. परंतु त्यांच्या चुकीच्या केलेल्या कामाची किंमत परिसरातील शेतकर्यांना मोजावी लागली, डाव्या कालव्यावर अवलंबून असणारी कवठे-केंजळ योजना बंद ठेवावी लागली.
कवठे-केंजळ योजनेच्या कामावर स्टे दिला असूनही निकाल आपल्या बाजूने लागल्याचे आमदार सांगून लोकांची फसवणूक करत आहेत. योजनेचे पाणी सोडण्याचा संदर्भात न्यायालयाचा काहीही संबंध नाही, न्यायालयाने पाटबंधारे खात्याने दाखल केलेली पाणी सोडण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली. शंभर कोटींचा निधी वाया गेला असून योजनेचे भवितव्य अंधारात आहे. पांडे येथील कालव्याचे काम प्लास्टिकचे कागद लावून लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.
हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन
परंतु माझ्यासारखा हाडाचा कार्यकर्ता हे कदापि खपवून घेणार नाही, रस्त्यावर उतरून पाण्यासाठी संघर्ष करावा लागला तरीही मागे हटणार नाही. त्यातच भरीस-भर रविवारी पहाटे चार वाजता व्याजवाडी परिसरात कालव्याच्या तळातच भगदाड पडून लाखो लिटर पाणी ओढ्यातून वाहून गेले. या दुर्घटनेने पुन्हा एकदा व्याजवाडी परिसरातील शेतकर्यांना आमदारांनी जोरका झटका दिला आहे. या परिसरातील हातातोंडाशी आलेली रब्बी हंगामातील पिके वाया जाणार आहेत. धोम धरणातील पाण्यासंदर्भात वाईच्या पूर्व भागातील शेतकरी रस्त्यावर उतरून हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन करणार असून त्यांच्या बरोबर पश्चिम भाग तालुक्यातील शेतकर्यांना सोबत आणून लढा उभारणार आहे.