वडूज -मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर चळवळ उभारणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवार, दि. 20 रोजी दहिवडी (ता.माण) येथे जाहीर सभा होत आहे. त्या सभेसाठी खटाव तालुक्यातून लाखो समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती खटाव तालुका समन्वयक विजय शिंदे, बाबा फडतरे, डॉ. संतोष गोडसे, नीलेश गोडसे, बाबा शिंदे, अनिल पवार, दत्तू घार्गे, अभय देशमुख, प्रशांत जाधव, सचिन फडतरे, निलेश गोडसे, भरत जाधव, बाळासाहेब पोळ, दिलीप मांडवे, विजय गोडसे, अमोल गोडसे, राजेंद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा गेली अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला विषय जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा समोर आला. त्यामुळे सरकार जागे झाले आहे. आता या चळवळीला मूर्त स्वरुप येण्यासाठी राज्यभर समाज बांधवांच्या भेटीगाठी करण्यासाठी जरांगे- पाटील सभा घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी दहिवडी (ता.माण) येथे सभा होत आहे. त्यासाठी खटाव तालुक्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित रहावेत, म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावागावात, घरोघरी जाऊन जागृती करण्यात येत आहे.
राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा
राजकारणात अडकून पडलेल्या समाज बांधवांची आजवर अनेक पक्षांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे राजकारणाचे जोडे काढून बांधवांनी समाज केंद्रस्थानी ठेवून निधड्या छातीने सभेला हजर राहावे, असे आवाहन खटाव तालुका समन्वयकांनी केले आहे.
=============