पुणे – थकीत वीजबिलाचे वाढते प्रमाण, वीज बिल जादा आल्याच्या तक्रारी, विजेची चोरी या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणने आता प्रीपेड मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारी महावितरणने सुरू केली आहे. येत्या काही महिन्यात हे मीटर टप्प्याटप्याने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीजबिल बंद होणार असून ग्राहकांना आता आधीच मीटर रिचार्ज करावे लागणार आहे.
राज्यातील महावितरणच्या 2 कोटी 41 लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून, त्या ऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येईल. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे.
किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाइल फोनवर मिळणार आहे, त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना ठरवता येईल. ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहे. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.
सध्याच्या पद्धतीत वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने नेहेमीपेक्षा जास्त वीज वापरली, तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीज वापराची आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हेसुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाइन पेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे.
पैसे संपले तरी वीज पुरवठा रात्री चालूच राहील
एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.