सातारा – जलजीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असल्याने सर्व कामे दर्जेदार व विहित मुदतीत पूर्ण होण्याकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या जिल्ह्यातील कामांचा आढावा घएण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले (सातारा) व विजय वाईकर (कराड), सर्व गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा उपअभियंता उपस्थित होते. या बैठकीत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.
मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या तसेच कामाचा योग्य दर्जा न राखणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री देसाई यांनी प्रशासनास दिले. जलजीवन मिशन उपक्रमांतर्गत कोणीही वंचित राहणार नाही याकरिता या योजनांमध्ये काही फेरबदल, सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास तसे प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.