सातारा – राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी विविध मागण्यांबाबत सातारा जिल्हा परिषदसमोर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलकांच्या मागण्या या एजन्सीशी निगडीत असल्या तरी त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. या आंदोलनात शासनाने इतकेही असंवेदनशील असू नये, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्वशीला चव्हाण यांनी सरकारवर आगपाखड केली.
येथील जिल्हा परिषदेसमोर राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे वेतनवाढ व खाजगी कंपनीचा कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास याबाबत आंदोलन सुरु आहे. राज्यातील जवळपास 20 हजार कर्मचाऱ्याचा हा प्रश्न आहे. या प्रश्नावर सुनीता आमटे यांनी नागपूर येथे अधिवेशन काळात आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव येथील घरासमोर आंदोलन केले. पण शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात तरी न्याय मिळेल म्हणून आंदोलनकर्त्या सुनीता आमटे येथे आंदोलन सुरु केले. नऊ दिवस अन्न, पाणी न घेतल्याने त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली. तरीसुद्धा शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.
उलट हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला गेला. या आंदोलनाची व तेथे उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची माहिती सौ. सत्वशीला चव्हाण यांना समजताच त्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली. सुनीता आमटे यांच्या तब्येतीची चौकशी करून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून सूचना दिल्या. यावेळी काँग्रेस पदाधिकारी सुषमा राजेघोरपडे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सौ. सत्वशीला चव्हाण म्हणाल्या, या आंदोलनाची शासन दखल घेत नाही ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे. सुनीता आमटे यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्याची दखल शासन घेत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावरूनच राज्यात असलेले खोके सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत किती गंभीर व असंवेदनशील आहे हे दिसून येते. याबाबत सरकारने गांभिर्याने दखल घ्यावी, असे आवाहन सौ. चव्हाण यांनी केले.