सातारा -दहावीच्या परीक्षेत (माध्यमिक शालांत) सातारा जिल्ह्याचा निकाल 97.25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी 86 टक्के निकाल लागला होता. यावर्षी 11 टक्के वाढ झाली असून कोल्हापूर विभागात सातारा जिल्हा दुसऱ्या स्थानी आला आहे.
जिल्ह्यात 116 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी 39 हजार 784 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 38 हजार 688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 97.25 टक्के लागला आहे.
करोना संकटामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करुन सरासरी गुण देण्याचा निर्णय झाला होता. सातारा जिल्ह्यातील नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 97.25 टक्के, रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल 72.86 टक्के लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 98.21 टक्के, सांगली जिल्हा 97.22 टक्के असा निकाल लागला आहे.
सातारा जिल्ह्यातील दहावीच्या एकूण विद्यार्थ्यापैकी उत्तीर्ण मुलांची संख्या-20323 (96.24 टक्के) अशी आहे. एकूण उत्तीर्ण मुलींची संख्या- 18365 (98.38 टक्के) अशी आहे. जिल्ह्यातील विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी 17015 आहेत. तर श्रेणी 1 मध्ये 13543, श्रेणी 2 मध्ये 6828 विद्यार्थी आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 1302 अशी आहे.