सातारा – महाराष्ट्रातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी विहीर अशी प्रसिद्धी असलेल्या साताऱ्यातील बाजीरावच्या विहिरीला टपाल विभागाच्या पोस्ट कार्डवर स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील सात ऐतिहासिक स्थळांना केंद्र शासनाच्या आदेशाने पोस्टकार्डावर छायाचित्र प्रसिद्ध करण्यास परवानगी मिळाली आहे. पुण्यातील एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर व साताऱ्यातील वारसा ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला होता.
सातारा शहराच्या इतिहासाला पुन्हा झळाळी मिळाली असून या प्रस्तावासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून वारसा ग्रुपने परिश्रमपूर्वक दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. सातारा शहरातील शुक्रवार पेठ बाजीरावची पेठ ओळखली जाते हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. छत्रपती शाहू महाराज व बाजीराव पेशवे यांच्यामध्ये याच विहिरीच्या दुसऱ्या मजल्यावर दालनामध्ये खलबते चालत असत. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच या विहिरीचे बांधकाम झाल्याची नोंद आहे. वारसा समूहाचे अध्यक्ष राजेंद्र कानिक, एमआयटी स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे रोहन काळे, हेमंत लंगडे, धनंजय अवसरे, शैलेश करंदीकर यांनी परिश्रमपूर्वक या विहिरीच्या रचनेचा अभ्यास करून विहीर संवर्धनाचा प्रस्ताव दिला होता.
अमरावती, पुणे, सातारा, वाखरी येथे स्टेपवेल प्रकारातील सात विहिरी आहेत. साताऱ्यातील बाजीरावची विहीर सातव्या क्रमांकाची मोठी विहीर आहे. पुष्करणी, पोखरण, पायविहिर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळ्या स्टेप वेलमधून राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील आठ छायाचित्रांचा समावेश केंद्र शासनाच्या पुस्तिकेत करण्यात आला आहे. यामध्ये बाजीरावच्या विहिरीचा समावेश आहे. ही विहीर शंभर फूट खोल असून तिचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे. या विहिरीला नऊ कमानी असून या विहिरीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचे दगडी शिल्प राज चिन्हासह कोरण्यात आले आहे. या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे असून ज्यावेळी कास व खापरी नळ पाणीपुरवठा योजना होती, त्यावेळी याच विहिरीचे पाणी वापरले जात होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य या परिसरात असल्याने या पेठेला बाजीराव पेठ आणि याच परिसरातील विहिरीला बाजीराव विहीर असे संबोधले जाते. केंद्र शासनाच्या टपाल खात्यामार्फत पोस्ट कार्डावर यापुढे बाजीरावच्या विहिरीचे छायाचित्र प्रसिद्ध केले जाणार आहे. हा साताऱ्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा मोठा गौरव असल्याचे उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.