खंडाळा – खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु न झाल्याच्या निषेधार्थ शिरवळ ग्रामपंचायतीसमोर भारतीय जनता पक्षाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्यासह सात युवकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिरवळ पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आले.
शिरवळ (ता. खंडाळा) येथे जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चार कोटी 72 लाख 83 हजार रुपये किंमतीची जलशुद्धीकरण योजना मंजूर झाली आहे. दरम्यान, त्यासाठी आवश्यक जलशुद्धीकरण केंद्रासाठी 10 गुंठे व 1.80 लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीसाठी दोन गुंठे जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिरवळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ शिरवळ ग्रामपंचायतीकडून जागा सूचित करण्यात आली होती.
मात्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग खंडाळा येथील उपअभियंत्यांच्या पाहणीनंतर ही जागा शासकीय नियमावलीनुसार अपुरी असल्याबाबत मोजमापानंतर निदर्शनास आले.त्यानुसार उपअभियंता खंडाळा उपविभाग व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा यांचा अहवाल प्राप्त होताच याबाबत संबंधितांशी लेखी व तोंडी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार व पाहणीनुसार शिरवळ येथील शासकीय गट नंबर 944 मधील जागा निश्चित करीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले होते.
परंतू जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी जनता फाउंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य उर्फ पप्पू कांबळे, इम्रान उर्फ पप्पू काझी यांच्यासह काही युवकांनी खंडाळा पंचायत समितीसमोर घंटानाद करीत आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानुसार आज शिरवळ ग्रामपंचायतीसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतानाच, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अनुप सूर्यवंशी, अजिंक्य उर्फ पप्पू कांबळे, इम्रान उर्फ पप्पू काझी,हितेश जाधव, गणेश पानसरे, गजानन कुडाळकर, केदार हाडके यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतू शिरवळ पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले. घटनेनंतर आमदार जयकुमार गोरे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यात महायुतीचे सरकार असताना कार्यकर्त्यांना आंदोलनाची वेळ यायला नको होती, असे स्पष्ट करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याबरोबर चर्चा करून शिरवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.