मुंबई : राज्यात प्रत्येक दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांकडून राजकीय नाट्याचा नवा अंक समोर आल्याचे पहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या एका शिष्टमंडळाने दिल्लीत गृहमंत्र्यांना भेटून याविषयीची माहिती दिली होती. यासर्व प्रकरणावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांच्या जखमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी,”आमच्या हातातली हिंदुत्त्वाची गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायची आहे, त्यांच्या डोक्यावर जाऊन आपटेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीकादेखील राऊतांनी यावेळी केली. जे अस्वस्थ नेते आहेत, अशांत नेते आहेत, त्यांनी आपल्या घरी हनुमान चालिसाचं पठण करावं, त्यांच्या मनाला शांती मिळेल असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबत किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या ओठांच्या खाली सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
“महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात, त्यांना इतकं लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय? कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.”, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले,”देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने वापर केला जातो, न्यायालयांवर दबाव आणला जातो, विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये कशाप्रकारे दहशतीखाली आहे. याबाबत, मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ते कोणत्या हिटलशाहीविषयी बोलत आहेत हे समजून घ्यावं लागेल.”, असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, “राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना लोकशाहीची इतकी चिंता आहे तर त्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि त्यांनी भूमिका मांडली आहे ती फक्त महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय स्तरावरची असू शकते. कारण संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण झाली आहे का? अशी चिंता सर्वांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही त्यांच्याशी बोलू”
“उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही, हुकूमशाही, कायदा सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आसाम सरकारने गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना नरेंद्र मोदींबाबत ट्वीट केल्याप्रकरणी अटक करुन सुटका कल्यानंतर पुन्हा अटक केली. हे नेमकं कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? यावरही फडणवीसांनी मनमोकळं केलं पाहिजे. कारण त्यांना ही लोकशाहीची उबळ आली आहे ती राष्ट्राच्या हिताची आहे.”, असेही संजय राऊत म्हणाले.