मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना आणि सत्ताधारी यांच्या शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचं आहे असाही दावा करु शकतात अशी टीका केली आहे. तसेच महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, “महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जातोय. ब्लॅकमेलिंगही होतंय. पण ठिक आहे. जो होगा वो देखा जायेगा. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे असे त्यांनी म्हटले.
“मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची रुटिन व्हिजिट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथे आहे, म्हणून त्यांना दिल्लीत यावं लागतं. मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिलेयत दोन. एक मनोहर जोशी, दुसरे नारायण राणे. पण त्यांना मी कधी दिल्लीत आल्याचं पाहिलं नाही. त्यांच्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या.”
“लढाई कोणतीही असू द्यात. चिन्हाची, पक्षाची कोणतीही. मी तुम्हाला सांगतो की, कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी कालही आपल्याला सांगितलं. ज्या पद्धतीनं छुपे वार सुरु आहेत. जसं महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भाजपचे नेतेच सांगतात. अखंड महाराष्ट्र तोडायचा, असं आम्ही नाही, तर भाजपचे नेते सांगतात. जर महाराष्ट्राचे तुकडे करायचे असतील तर आधी अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेचे तुकडे करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहिल. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागले आहेत. त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो.”, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “माध्यमांमध्ये संजय बंडू जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण काल स्वतः संजय बंडू जाधव माझ्यासोबत होते. आताही फोन आला, ते अस्वस्थ आहेत, कारण माझं नाव वारंवार का घेतलं जात आहे? हा प्रश्न त्यांना पडला आहे. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, मी खासदारकी आणि आमदारकीसाठी पक्षात नाही. मी एका निष्ठेनं, श्रद्धेनं आणि विचारानं या पक्षात आहे. असे अनेक खासदार आहेत, ज्यांना अमिषं, धाक दाखवला असेल. त्यामुळे त्यांनी जाण्याचा विचार केला असेल, जोपर्यंत ते अधिकृतपणे जात नाहीत, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. ते गेल्यावर ते का गेले? हे सांगायला आम्ही मोकळे राहू.”