मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटात रोजच आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी,’दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे’, अशी टीका केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी,”एकनाथ शिंदे यांना कोणीही मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव नाही, हे दुर्देवं आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. मात्र, गेल्या सहा-सात महिन्यांपासून महाराष्ट्र हे या देशाच्या खिजगंटीत अजिबात नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आले. त्यामुळे त्याचं सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राचे पंख कापले गेले. राज्याच विकास काही लोकांना पाहवत नाही. दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींना बजावण्यात आलेल्या हक्कभंग नोटीशीबाबतही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांना नोटीस बजवण्याचं कोणतही कारण नव्हतं. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलं आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधानांनी द्यायला हवी होती. त्यांना ती संधी होती. मात्र, त्यांनी या प्रश्नांची उत्तरं न देता हक्कभंग केला आहे. हक्कभंगाची कारवाई तर पंतप्रधान मोदींवर व्हायला हवी होती. मात्र, ती राहुल गांधींवर झाली. यालाच हुकूमशाही म्हणतात, असेही ते म्हणाले.
भाजपा कार्यकारणीच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, भाजपाने कितीही ठराव पारीत केले, तरी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच विजय होईल. ज्या मुख्यमंत्र्यांचा समावेश पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्येही होत नाही, त्यांच्या नेतृत्वात जर भाजपा लढणार असेल, तर कोणत्याही महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणं शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.