नगर – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेर येथे 7 मे, तर जामखेड शहरात 6 मेपर्यंत संचारबंदी वाढविली आहे. तसेच दोन्ही शहरांच्या मध्यबिंदूपासून दोन किलोमीटर परिसर सील केला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साथरोग अधिनियमाअंतर्गत 13 मार्चपासून उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी जामखेड शहर हे 1 मेपर्यंत बंद करण्यात आले होते. मात्र जामखेडमध्ये दोन व संगमनेर शहरात चार करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
याची दखल घेत प्रशासनाने खबरदारी म्हणून हॉटस्पॉट केंद्र घोषीत केले. त्यामुळे जामखेड शहर व संगमनेर शहर परिसरातील आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री 6 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत.
या परिसरात कंट्रोल रूम स्थापन करून 3 ते 4 अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांचे कामकाज शिफ्टमध्ये करावे, तसेच त्यांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नोंदवही ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच सर्व तक्रारींचे निरसन होईल.
जीवनावश्यक वस्तुंसाठी शासकीय यंत्रणा
नागरिकांना आवश्यक असणारा दूध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे योग्य शुल्क आकारून शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे व्हेंडर निश्चित करून पथके केली जाणार आहेत.
“त्यांच्यावर’ होणार कायदेशीर कारवाई
जामखेड शहरात कर्जत येथील उपविभागीय अधिकारी संनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटनांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 188 नुसार कादेशीर कारवाई केली जाणार आहे.