जिल्हाधिकारी राम : पुणेकरांनी सहकार्य करावे
पुणे – सध्या आपण मोठ्या प्रमाणात टेस्ट करत आहोत, त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही, परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबवले आहे. अशा प्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
बाधितांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. जीवनावश्यक वस्तू आणायला वारंवार बाहेर जाऊ नका. सर्दी, ताप, खोकला, थकवा आणि भूक लागत नसेल तर तातडीने डॉक्टरांना दाखावा. आजार अंगावर काढू नका किंवा लपवून ठेऊ नका. वेळेवर उपचार मिळाले, तर रुग्ण बरे होतात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. भाजीपाला देखील काही दिवस नागरिकांना मिळणार नाही. तसेच उद्योजकांनी कामगारांची व्यवस्था तेथेच करावी. त्यांना अजिबात बाहेर जाता येणार नाही.