खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्पष्टीकरण
कोरेगाव भीमा- छत्रपती संभाजी महाराजाच्या जीवन चरित्रवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवर समाजमाध्यमातून होणारी चर्चा चुकीची आहे. मालिका बंद करण्यासाठी कोणाचाही दबाव नसून पूर्व नियोजित कथानकानुसार मालिकेचा समारोप होत आहे, अशी माहिती खासदार तथा कलाकर डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
वढु बुद्रुक (ता. शिरुर ) येथे छ. संभाजी महाराज समाधी स्थळावर डॉ. अमोल कोल्हे व मालिकेतील सर्व सदस्य नतमस्तक होण्यासाठी आले होते, त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या बलीदान रहस्यमय टप्प्यावर असताना मालिका काही राजकीय दबावमुळे लवकरच गुंडाळली जाते, आशी प्रसार माध्यमातून चर्चा आहे.
याबाबत डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत आणि खरा इतिहास जगापुढे आणणाऱ्या “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराजांचा जो इतिहास आहे तो दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत चुकीचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पण यात काही तथ्ये नाही. पवार कलाकारांच्या मागे ठाम असतात ते कधीही हे दाखवा ते दाखवू नका, यात हस्तक्षेप करीत नाही, मालिकाच्या पूर्वी झालेल्या कथानकानुसार नियोजित वेळेत समारोप होत आहे, असे त्यांनी नमूद केले.