सातारा – मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध अभियानाद्वारे शासनस्तरावर प्रयत्न होत आहेत. “बेटी बचाव बेटी पढाव’ या अभियानाद्वारे शासनाने लोकांमध्ये जनजागृती करून मुलींविषयी प्रकाश टाकला आहे. मातृत्व हा स्त्रियांना निसर्गाने दिलेला हक्क असून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कुटुंबात मुलगी हीच सर्वस्व असून ती राष्ट्रीय संपत्ती आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सोनाली पोळ यांनी व्यक्त केले.
बाल विकास प्रकल्पाचा “बेटी बचाव, बेटी पढाव’ या अभियान कार्यक्रमप्रसंगी सौ. पोळ बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, माजी सभापती वनिता गोरे, उपसभापती अरविंद जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, जि. प. सदस्या सौ. अर्चना देशमुख, कमलताई यादव, अनिता चोरगे, डॉ. शिवाजीराव चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी शैला खामकर-सापते आदी उपस्थित होते. मुलींचे घटते प्रमाण ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. लोकांनी मुलगा वा मुलगी असा भेदभाव न करता मुलींना जपणे गरजेचे आहे. सध्याच्या मुली अनेक क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवत आहेत. आजची मुलगी ही उद्याच्या धनाची पेटी आहे, असे मत सौ. सरिता इंदलकर यांनी व्यक्त केले.
वनिता गोरे म्हणाल्या, मुलगी नको ही लोकांची असलेली मानसिकता बदलल्याने मुलींचे वाढलेले प्रमाण दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून “माझी कन्या भाग्यश्री’ अशा विविध योजना लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवून समाजामध्ये जनजागृती केली जात आहे. “बेटी बचाव बेटी पढाव’अशा अभियानाची गरज असून हा उपक्रम स्तुत्य आहे. याप्रसंगी जि.प.सदस्य डॉ. शिवाजीराव चव्हाण, सौ. अर्चना देशमुख व शैला खामकर-सापते यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात एक वा दोन मुली असणारे दांपत्य, तसेच विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या मुलींचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. “बेटी बचाव बेटी पढाव’ याविषयी रांगोळी व पोस्टर्स प्रदर्शन, पथनाट्य,प्रात्यक्षिके व शिवकला आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.
पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे, दयानंद उघडे, सौ. विजया गुरव, सौ. विद्याताई देवरे, मार्केट कमिटीचे चेअरमन गणपतराव शिंदे, विस्ताराधिकारी अनिल ओंबळे, पर्यवेक्षिका सौ. रोहिणी सत्रे, सुलभा कांबळे, उमा साळुंखे, सौ. सारिका ढाणे, विविध बिटातील सेविका, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सौ. वृंदा शिवदे यांनी केले. प्रास्ताविक सौ. लीना पवार यांनी केले. आभार सौ. सुवर्णा कणसे यांनी मानले.