आषाढ कृष्ण त्रयोदशीला संत नामदेव यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म नांदेड जवळील नरसी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नामदेव दामा रेळेकर. नामदेवांचे पूर्वज तसेच वडील शिवणकामाचा व्यवसाय करीत असत. व्यवसायानिमित्ताने ते पंढरपूर येथे येऊन राहिले. एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव-चरित्रावरून नामदेवांच्या आईने पुत्रप्राप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचे या चरित्रात नमूद आहे.
नामदेवांच्या नावावर सांगितले जाणारे “आत्मचरित्र’ हा नामदेवांचे इतिहासासाठी चरित्रविषयक संदर्भ समजला जातो. त्यामध्ये “शिंपियाचे कुळी जन्म मज झाला’ असे लिहिले आहे. नामदेवांच्या घरात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते. त्यामुळे नामदेवांनाही बालपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. नामदेवांचा विवाह राजाई यांच्याशी झाला होता. त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र झाले आणि लिंबाई नावाची एक मुलगी झाली. विठ्ठलभक्तीमुळे नामदेवांना विरक्ती येऊ लागली. त्यांचा परिवार मोठा होता. त्यांची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मातापित्यांस वाटे. नामदेव भक्ती-परमार्थाच्या मार्गावरून ढळले नाहीत. उलट हे कुटुंबच भक्तिमार्गाशी जोडले गेले. त्यांच्या घरातील सेवेकरी जनाबाई ही पण पांडुरंग भक्तीमध्ये रममाण झाली होती.
वर्ष 1291 मध्ये नामदेवांची ज्ञानदेवांशी भेट झाली असावी. या भेटीनंतर आपली भक्ती गुरूपदेशावाचून अपुरीच आहे, याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला, त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. श्रीज्ञानदेव व इतर संतजन पंढरपूर येथे जमत असत. नामदेवांच्या घरातील ओसरीवर संतांची मांदियाळी भक्तिरसात बुडून जायची. ही सर्व मंडळी मराठवाड्यात गोराकुंभार यांच्याकडे गेल्याचाही उल्लेख येतो. तसेच विठ्ठलभक्तीत रममाण होणारे संत सावता माळी यांना ही सर्वमंडळी भेटण्यास गेल्याचे सांगितले जाते. एकदा ज्ञानदेवांनी तीर्थाटनाची इच्छा व्यक्त केली. नामदेवांनी त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी भेटी दिल्या. वर्ष 1296 मध्ये तीर्थयात्रेहून परतल्यानंतर ज्ञानदेवांनी लवकरच समाधी घेतली.
त्यानंतर “नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावूजगी।।’ या भावनेतून 54 वर्षे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला. वीणा व चिपळ्या यांचा वापर करून त्यांनी नारदीय कीर्तन परंपरा वृद्धिंगत केली. स्वतः नामदेवांनी भारतभ्रमण केले होते. ते पंजाबमध्ये घुमान येथे सुमारे 12 वर्षे राहिले होते. त्यांच्या कार्याचे स्मरण पंजाबातील लोकांना आजही आहे. तेथे त्यांच्या नावाचा गुरुद्वाराही आहे. तसेच नांदेड येथे येणारे भाविक नामदेवांच्या जन्मगावी नरसी येथेही आवर्जून भेट देतात.
“नामदेवजी की मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील 61 पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षी जीवितकार्य संपविण्याचे ठरविले. विठ्ठलापुढे जाऊन “आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली आणि पंढरपूर येथे विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलदर्शनासाठी येणाऱ्या सर्व संतसज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी, ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच हे समाधीस्थान तयार करण्यात आले. ते नामदेवाची पायरी म्हणून ओळखली जाते.
गणपतीच्या आरतीनंतर किंवा कुठल्याही पूजा विधीनंतर चार कडव्यांची प्रार्थना म्हटली जाते. त्यातील पहिले कडवे मराठीतून म्हणजे “घालीन लोटांगण वंदीन चरण। डोळ्यांनी पाहीन रूप तुझे।।’ ही नामदेवांची सुंदर रचना आहे. त्यामुळे आरतीरूपाने नामदेव आपल्या सर्वांच्या मुखी येतात.