सातारा – रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे मागील काही दिवसांत तेलाच्या दरात भरमसाठ वाढ होत असताना आता इंधन व खताच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया आणि बेलारुसमधून भारतात पोटॅश व फॉस्फरच्या कच्च्या मालाची आयात केली जाते. मात्र, युद्ध सुरू झाल्यानंतर आयातीत अडथळे निर्माण झाल्याने पोटॅश व फॉस्फरसयुक्त खतांचे दर वाढणार असल्याचे मत कृषी क्षेत्रातीत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
युद्धामुळे जगभरातील आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे असून जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे. रशिया, युक्रेन, बेलारुस यासारख्या देशांमधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात केला जातो. भारतात खतांच्या एकूण आयातीपैकी जवळपास 12 ते 15 टक्के आयात रशिया आणि बेलारुसमधून होते. खतनिर्मितीत रशियाचा जगभरात चौथा क्रमांक लागतो. रशिया आणि बेलारुस पोटॅशचे मोठे निर्यातदार देश असून युक्रेनही पोटॅशची निर्यात करतो. युद्धामुळे पोटॅशचा पुरवठा होणे कठीण झाल्याने पुढील काही दिवसात खतांचे दर वाढण्याची शक्यता आहे. इंधन, तेल, गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असतानाच आता खत दरवाढीने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. खतांच्या निर्मितीसाठी पोटॅशची आवश्यकता असते.
युद्ध सुरु झाल्यानंतर पोटॅश व फॉस्फरसच्या कच्चा मालाचा पुरवठाच कमी झाल्यामुळे खतांच्या किंमतीत 400 ते 500 रुपयांची वाढ होण्याचा अंदाज आहे. रशिया आणि बेलारुसवरील निर्बंधांमुळे पुढील काळात पुरवठ्यामधील अडथळे वाढण्याची शक्यता आहे. आयातमूल्य वाढण्याची शक्यता आहे. खतांवर मिळणारे अनुदान सरकारने बंद केल्याने खतांच्या दरात आधीच भरमसाठ वाढ झाली होती. आता युद्धाचा परिणाम कृषी क्षेत्रावर हाण्याच्या शक्यतेने शेतकरी संकटात सापडणार आहे.
33 हजार मेट्रिक टन खताचा साठा
सातारा जिल्ह्यात खताचा साठा मुबलक प्रमाणात आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात 32 हजार 300 मेट्रिक टन खत शिल्लक असून खताचे दर वाढल्यास जादा दराने खत विक्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आधीच खतांचा साठा ठेवण्याची गरज आहे. जिल्ह्यात 11 हजार 566 मेट्रिक टन युरिया, डीएपी 3 हजार 567 मेट्रिक टन, एमओपी 1 हजार 95 मेट्रिक टन, एनपीके 10 हजार 54 मेट्रिक टन, एसएसपी 6 हजार 91 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. रशिया- युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर खतांचे दर वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.