पुणे- अवघ्या महिन्याभरापूर्वी सिंहगड रस्त्यावरील राजारामपूल चौकात उभारलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या “गड आला पण सिंह गेला’ या शिल्प स्मारकाची दुरवस्था झाली आहे. या स्मारकासमोर बसवलेल्या शोभेच्या दिव्यांची तोडफोड झाली असून एक दिव तोडण्यात आला आहे. दुसरा अर्धवट तुटला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवजयंतीनंतर या स्मारकाचा वीज पुरवठाही बंद असून हे शिल्प अंधारात आहे.
महापालिकेच्या माध्यमातून मागील महिन्यात 19 फेब्रुवारीचा मुहूर्त साधत शिवजयंतीला या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतरही या स्मारकाचे काही राहिलेले काम सुरूच होते. त्यात, काही दिवसांपूर्वीच स्मारकाच्या समोरील पदपथावर तब्बल 2 लाख रुपयांचा खर्च करून चार शोभेचे दिवे बसवले होते. 21 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या तिथीनुसार शिवजयंतीपर्यंत या स्मारकाची प्रकाश यंत्रणा तसेच समोरील दिवे सुरू होते. मात्र, मागील दोन दिवसांत या पथदिव्यांमधील दोन दिव्यांची मोडतोड झाली असून एक मोडलेला पथदिवा स्मारकाच्या बाजूला फेकून दिला आहे. याशिवाय, त्या ठिकाणी वीज यंत्रणेचे साहित्यही टाकले आहे. विशेष म्हणजे या पथदिव्यांचे प्लॅस्टिकचे अवरणही अद्याप काढलेले नसतानाच त्यांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. तर, या स्मारकाचे काम करणाऱ्या पथविभाग, विद्युत विभागासही याबाबत काहीच माहिती नसल्याचे चित्र असून याप्रकरणी दोन्ही विभागांनी हात वर केले आहेत.