कोंढवा – करोना प्रादुर्भावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी ग्राहकांकडून मात्र अद्यापही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेलचा दररोजचा व्यवसाय पूर्वीपेक्षा अवघ्या 5 ते 10 टक्क्यांवर आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांपुढेच रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोंढवा, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, सासवड रोड परिसरात अनेक लहानमोठे रेस्टॉरंट बार आहेत. मात्र, यातील अनेक हॉटेल्स परवानगी मिळूनदेखील सुरू झालेली नाहीत. हॉटेल व्यावसायिकांसमोर विविध अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. लॉकडाऊन थोडेच दिवस असेल, करोना लवकर जाईल या विश्वासावर हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आचारी यांना मालकाने पगार दिले. मात्र, लॉकडाऊन वाढतच राहिला व करोनाचा प्रादुर्भावही वाढला. यातून हॉटेलमधील कुक, कॅप्टन, मॅनेजर व इतर कामगारांनीही गावची वाट धरली. त्यामुळे परवानगी नंतरही सर्वच हॉटेल सुरू झालेली नाहीत.
ग्राहकांच्या मनात करोनाची भीती कायम आहे. यामुळे जेवणासाठीचे खास बेत आखणाऱ्या ग्राहकांचे प्रमाणही कमी झाले आहे. ग्राहक नसतील तर हॉटेल सुरू करणार काय उपयोग? नुकसान किती दिवस सहन करणार? असे प्रश्न व्यावसायिकांपुढे आहेत.
लॉकडाऊनच्या काळात हॉटेल मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नव्याने भांडवल उभारूनच व्यवसायाला सुरुवात करावी लागत आहे, त्यातच 90 टक्के व्यावसायिकांवर अर्थसंस्थांचे पूर्वीचेच कर्ज आहे. यामुळे भांडवल उभारतानाही व्यावसायिकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
राज्य शासनाने काही अटी, शर्थींवर हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे, आम्ही करोनाबाबत सर्व सुरक्षितता बाळगून योग्य त्या उपाययोजना करून हॉटेल सुरू केले आहेत; परंतु नागरिकांमध्ये करोनाची भीती असल्याने अजून तरी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.
– हिंमत हांडे, शिवेंद्र हॉटेल, हांडेवाडी