“अहा! अळूची वडी. माझ्या खूपच आवडीची आहे.’
सानिकाने पटकन् मिहीरच्या डब्यातील अळूची वडी घेऊन तोंडात टाकली.
“ए सानिका, आम्हाला पण आवडते बर अळूवडी एकटीच नको संपवू सगळ्या वड्या,’ असं म्हणत सगळ्यांनीच खुसखुशीत अळूच्या वड्यावर ताव मारला.
अंगतपंगत करायची म्हणून प्रत्येकजण आपापला डबा घेऊन मिहीरच्या घरी जमले होते. एकेकाने डबा उघडला तसे ढोकळा, काकडीची कोशिंबीर, साखरआंबा, चटकदार कैरी लोणचे असे एक से एक भारी पदार्थ समोर आले. मिहीरच्या आईने खास सायीचे दही घालून उडदाच्या डाळीची व मिरचीची फोडणी दिलेला भातही कालवला होता. पण सगळ्यांनी आधी खमंग, खुसखुशीत आणि आंबटगोड अळूवड्यांवर ताव मारला.
अळूवडीचा आनंद घेत असतानाच प्रणवच्या मनातला शंकासूर नेहमीप्रमाणे जागा झाला. त्याची अस्वस्थता पाहून मिहीर बोललाच, “शंकासुरा विचारा तुमची शंका. तुमच्या शंकेमुळे आमच्याही ज्ञान सागरात भर पडेल.’
“हो आहे माझ्या मनात शंका. तुला काय अडचण आहे? मी काकूंना विचारणार आहे तुला नाही.’
“ए प्रणव, चिडतोस काय रे? उलट तू प्रश्न विचारले की आम्हालाही नवीन माहिती मिळत असते.’
“हो रे प्रणव, तन्वी अगदी बरोबर बोलते आहे.’
तेवढ्यात मिहीरची आई तेथे आलीच. “काय रे पोरांनो कसला गोंधळ आहे?’
“काकू एक प्रश्न विचारू?’
“विचार ना प्रणव. वड्या आवडल्या ना तुला?’
“हो काकू खूपच. आणि आज या वड्या खाल्ल्यावर घशात अजिबात खाज आली नाही. असे कसे काय?’
“अरे वा! खातानाही शंका आहेतच का? मुलांनो अळू खाल्ल्यावर किंवा अगदी चिरतानाही का खाजतो माहीत आहे का?
अळूमध्ये असते कॅल्शियम आक्झलेट नावाचे स्फटिक. त्याची रचना टेट्रागॉनल म्हणजेच चतुष्कोनीय असते व हे कोन अणकुचीदार असतात. जेव्हा अळूची भाजी किंवा वडी खाल्ली जाते तेव्ही हे स्फटिक घशात टोचतात. त्यामुळे घशात खवखव येते.’
“खवखव का होते ते कळले; पण मग आज कसा काय त्रास झाला नाही.’
“कारण वड्या करताना बेसन पिठात मी चिंचेचा कोळ घातला होता ना. चिंचेतील टार्टारिक आम्लामुळे या स्फटिक विरघळतात. त्यामुळे टोकदारपणा जाणवत नाही.’
“चिंचच घालावी लागते का,’ आता तन्वीलाही प्रश्न पडला होता.
“नाही काही. आमसूलही चालते की आणि भाजी करताना आंबट चुका अळूबरोबर घेतला की चिंच कमी असली तरी चालते.’
“आई अळीमधले स्फटिक तर दिसत नाही, पण साधारण स्फटिक कसे असते हे कसे बघता येईल?’
“अरे, साखरेचा दाणा म्हणजे स्फटिकच आहे. आणि जर तुम्हाला प्रयोग करून बघायचा असेल तर जेवण झाल्यावर एक काम करा.’
मिहीरच्या आईने सांगितल्यानुसार या मित्रचौकडीने थोड्याशा पाण्यात भरपूर मीठ विरघळवून घेतले व हे पाणी पसरट ताटलीत ओतून, ती ताटली उन्हात ठेवली. उष्णतेमुळे पाण्याची वाफ झाली आणि ताटलीत खाली मिठाचे क्षारांचे स्फटिक मिळाले. मिहीरकडे मुलांसाठी असणारा सूक्ष्मदर्शी होता. त्या सूक्ष्मदर्शीचा वापर करून स्फटिकाची रचनाही त्यांना अजून छान बघता आली.
काय बालमित्रांनो, सोपं आहे ना करायला. तुम्हालाही हा सोपा प्रयोग करायला आवडेल आणि स्फटिकाची रचना बघायलाही.
पण तुमच्यासाठी एक प्रश्न बरं का, मिठागरात मीठ कसे तयार होते?
विशाखा गंधे