अमित डोंगरे
टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघात आजच्या सामन्याला हायव्होल्टेज ड्रामा असेच स्वरूप आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही विषय हा केवळ याच दोन देशांपुरता मर्यादित राहात नाही, तर त्याचे चर्वितचर्वण जगव्यापी होते. मग ते राजकारण असो किंवा क्रिकेट वा अन्य कोणताही खेळ. जगभरात कोणत्याही देशांतील सामन्यांपेक्षा या दोन देशांतील सामन्यांचा टीआरपी अफाट असतो.
सामना कोण जिंकणार, यापेक्षाही जास्त भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासाचीच पुनरावृत्ती करून पाकिस्तानचा पराभव करणार व विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचा विजयी जल्लोष पाहण्यासाठी मैदानात हजारो तर रस्त्यांवर लाखो चाहते गर्दी करणार यात शंका नाही.
पाकिस्तानला अद्याप एकाही विश्वकरंडक स्पर्धेत भारतावर विजय मिळवता आलेला नाही. मग ती एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा असो किंवा टी-20 सामन्यांची, प्रत्येक वेळी भारतीय संघानेच त्यांना धूळ चारली आहे. यंदाही हाच इतिहास कायम राहणार अशीच परिस्थिती दिसत आहे. या सामन्यापूर्वी दरवेळी प्रमाणे पाकिस्तानचे आजी माजी क्रिकेटपटू तोंडाच्या वाफा दवडत आहेत.
पाकिस्तानचा नवा संघ भारताला पराभूत करेल अशी मुक्ताफळे, अगदी त्यांचे पंतप्रधान व पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनीही भारताचा पराभव करण्यावर विश्वास व्यक्त केला. हे बोलताना ते विसरले की, जेव्हा हेच खेळाडू पाकिस्तान संघात होते तरीही ते पराभव टाळू शकले नव्हते. अन्य स्पर्धांपेक्षा विश्वकरंडक स्पर्धांमध्ये पाकिस्तानला एकदाही भारताचा पराभव करता आलेला नाही.
यंदा या दोन संघात आज (रविवार) सामना होत असून त्यापूर्वी त्यांचा कर्णधार महंमद रिझवानसह बाबर आझम व अन्य काही खेळाडूंना धमक्याही आलेल्या आहेत. भारताकडून पराभूत झालात तर जीवे मारू, अशा धमक्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या प्रत्येक लढतीच्या पार्श्वभूमीवर येत असतात इतके पराकोटीचे गांभीर्य या सामन्यांचे असते.
या दोन संघातील सामन्यांना केवळ लढतीचे नव्हे तर युद्धाचेच स्वरूप येते, हे कोणीच नाकारणार नाही. सीमेपलीकडून सुरू असलेली घुसखोरी, दहशतवाद यामुळे भारताला सहन करावा लागणारा त्रास पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये विजय मिळाल्यावर जणू युद्धात विजय मिळाल्यासारखाच साजरा केला जातो. पाकिस्तानकडून अन्य स्पर्धांत पराभूत झाल्यावर भारतात खेळाडूंवर काहीसे दडपण असते
मात्र, त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धोका होत नाही. मात्र, जर पाकिस्तानचा संघ भारताकडून हरला तर मात्र, त्यांच्या संघाचे चाहते आपला टीव्ही तर फोडतातच पण खेळाडूंची डोकी फोडण्याचीही तयारी करत असतात. मागे एकदा पाकिस्तानचा पराभव झाल्यावर त्यांचा तत्कालीन कर्णधार इंझमाम उल हक याने सांगितले होते की, आम्ही पराभूत झाल्यावर आधी इंग्लंडला रवाना झालो व तेथून एकेक खेळाडू टप्प्याटप्प्याने पाकिस्तानला रवाना झाला. इतकेच नव्हे तर या खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही या पराभवानंतर धोका असतो.
भारत आणि पाकिस्तान हे संघ विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासात आजवर तब्बल 12 वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. एकदिवसीय सामन्यांचा पहिला विश्वकरंडक 1975 साली खेळवला गेला होता. मात्र, या स्पर्धेत तसेच त्यानंतर 1979, 1983 व 1987 या सर्व स्पर्धांत वेगवेगळे गट असल्याने या दोन संघात सामनेच झाले नाहीत. भारत आणि पाकिस्तान 1992 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्यांदाच समोरासमोर आले होते.
याच स्पर्धेपासून भारताचे या स्पर्धांमध्ये पाकिस्तानवरचे वर्चस्व प्रस्थापित होणे सुरू झाले. 1992 सालापासून सुरू झालेली पाकिस्तानच्या पराभवांची मालिका 2019 पर्यंतही कायम राहिली. 12 वेळा पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सात वेळा एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत तर, 5 वेळा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतानेच विजय मिळवला आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास आहे.
यंदा सुरू झालेल्या टी-20 विश्वकरंडकात या दोन संघातील हा सहावा सामना ठरला आहे. 2007 साली हे संघ दोन वेळा समोरासमोर आले होते. दोन्ही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर भारताने 2012 साली पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 2014 व 2016 साली टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत देखील पाकिस्तानला पराभवाचाच सामना करावा लागला.
एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत 1992 सालासह 1996, 1999 आणि 2003 सालातही पाकिस्तानला पराभवच पत्करावा लागला. 2007 वगळता 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत करंडकही जिंकला होता. 2015 व 2019 सालच्या स्पर्धेतही पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. आता टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत यंदा 13 व्या वेळी हे दोन संघ समोरासमोर आले आहेत.
हा इतिहास झाला असे काही खेळाडू म्हणतात मात्र, एक गोष्ट निश्चित की आधी सौरव गांगुली नंतर महेंद्रसिंह धोनी व आता विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने जागतिक वर्चस्व मिळवले आहे. भारताच्या या विजयी धडाक्यात यंदाही पाकिस्तानवर पराभवाचीच नामुष्की येणार हाच विश्वास आहे.
आज होणारा हायव्होल्टेज ड्रामाही भारतीय संघच जिंकेल व पुन्हा एकदा विजयाची स्वप्ने पाहात असलेला पाकिस्तानचा संघ चारीमुंड्या चित होणार यात शंका नाही. या विजयासह कोहलीने टी-20 स्पर्धांमधील नेतृत्वातील या अखेरच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवत आयसीसी स्पर्धांमधील विजयाचा दुष्काळही संपवावा हीच अपेक्षा आहे.