राष्ट्रपती भवनमधील सर्वोच्च पुरस्कार नेहमीच उत्साह, प्रेरणा यांचा सोहळा असतो. सर्व पुरस्कारार्थी आपापले सर्वोच्च नागरी वीर-पुरस्कार अत्यंत शिस्तीत, नम्रपणे स्वीकार करत असताना आपण नेहमी पाहत असतो. प्रत्येकाचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून येते. त्या कार्यक्रमामध्ये अनेक “ती’ सुद्धा आपल्या कार्य कर्तृत्वाने सम्मानित असतात.
सैन्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचेकडे कायम लक्ष वेधले जाते. फार कमी वयामध्ये त्यांच्या वाटेला एकटेपण येते. राष्ट्रपतींच्या हस्ते परमोच्च सोहळा प्रदान होताना, वेगळेच रोमांच येते. अशा अनेक “ती’ आतापर्यंत सन्मानित केल्या गेल्या आहेत. आपल्या देशाला कायमच अशा अनेक “ती’ च्या धैर्याची, शौर्याची परंपरा लाभली आहे.
भारतमाता हे शब्द नाही जणू पंचाक्षरी मंत्रच. भारतमातेपासून सुरू झालेल्या प्रत्येक “ती’ चे अस्तित्व, कर्तृत्व, वेगळेपण दखल घेण्याजोगे. कधी “ती’ हवीशी असते तर कुणाला नकोशी. बाहेरच्या सुरक्षित, असुरक्षित जगात “ती’ चे जगणे, वावरणे, संवर्धन होणे, सगळेच विलक्षण. प्रत्येक जीव हा स्वतंत्र, वेगळे वैशिष्ट्य घेऊन जगत असतो. कधी अनाथ-निराधार, विधवा, वृद्धापकाळ, घटस्फोटीत, तर कधी कुमारी, नि:संतान, दिव्यांग, “विशेष’ अथवा हिंसेमुळे वाट्याला आलेले एकटेपण. प्रत्येकीची कारणे, समस्या, उपाययोजना व्यक्तीपरत्वे, परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी. मनुष्य समाजप्रिय आहे. आपण कायम एकटेपणाची कल्पना पण नाही करू शकत.
शरीराने एकटे असणे आणि मनाने एकटे पडणे वेगळे, अशा व्यक्ती गर्दीमध्येपण एकट्या असतात. शारीरिक-मानसिक हिंसेमधून आलेले एकटेपण सगळ्यात भयंकर. अशा कितीतरी जणी “पीडित’ होऊन मनाच्या बंदीवासामध्ये अथवा कोठेतरी अज्ञातवासामध्ये एकटेपणाची शिक्षा भोगत आहेत. या हिंसेमधून गमावलेले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कधीही भरून न निघणारे. परिणामी कमकुवत झालेली नाती आणि कधी कधी समाजाकडून, आप्तस्वकियांकडून टाळले जात असल्याचे वास्तव.
कधी “अनाथ’ म्हणून जगताना उपेक्षा, अवहेलना, अपमान, कायम प्रेमासाठी, स्नेहासाठी आसुसलेपणाची “रिक्त’ जागा घेऊन आयुष्य काढावे लागते. आर्थिकदृष्ट्या कमकुवतपणा येतो. भविष्यामध्ये कधी कमी-जास्त घडले तर “ती’ ने स्वावलंबी होणे, घरातील सदस्यांची जबाबदारी निभावणे, अपत्यांचे “आई-वडील’ अशी दुहेरी जबाबदारी निभावणे. चरितार्थ चालवण्यासाठी मिळेल ते काम शोधणे, मिळवणे. शिवाय एकटेपणाचा, कमकुवत भावनिकतेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणारी “जमात’च नव्याने होत आहे.
जगाची कवाडे कुटुंबासाठी बंद केल्यावर अशा नाजूक क्षणी बाहेरच्या बदललेल्या जगात स्वत:ला, परिवाराला जगवण्याचे कौशल्य कमी पडते. महामारीमध्ये एकलपणा आलेल्या “ती’ ची अवस्था याहून बिकट, आर्थिक बाजू कमकुवत, वैद्यकीय खर्च, कौटुंबिक आकस्मिक जबाबदारी, दर दिवशी नवी आव्हाने, नवे प्रश्न. आपण कधीच एकटे नसतो. आपल्या सोबत कायम कळत-नकळत पंचतत्त्वांचे ऋणानुबंध असतात. त्याप्रती असलेली कृतज्ञता व कृती समृद्ध करून जाईल. सर्वांगिण विकासाच्या ध्येयाकडे जाताना एक जबाबदार, सजग नागरिक म्हणून नव्याने जगता येईल. जणू फिरूनी नवे जन्मेन मी…
ऍड. मेघना कालेकर