नवी दिल्ली -इंधनाच्या प्रलंबित दरवाढीच्या मुद्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली. पाच राज्यांमधील विधानसभांच्या निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर निवडणूकांशी संबंधित ऑफर संपुष्टात येईल. त्यापूर्वी नागरिकांनी आपल्या वाहनांच्या पेट्रोलच्या टाक्या भरून घ्याव्यात कारण निवडणूकीच्या निकालांनंतर पेट्रोलची दरवाढ केली जाईल. अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभांच्या निवडणूकांच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी समाप्त झाला. त्यानिमित्ताने राहुल गांधी यांनी ट्विटरवरून ही उपरोधिक टीका केली आहे. “आपल्या वाहनांच्या पेट्रोलच्या टाक्या लगेच भरून घ्या. कारण मोदी सरकारची इलेक्शन ऑफर लवकरच संपणार आहे.’ असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी पेट्रोल पंपाचा फोटोही पोस्ट केला आहे. “वाढ’ अशी अक्षरे त्यावर लिहीली आहेत. त्याबरोबरच “तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर लवकरच येत आहे.’ असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.
पाच राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने इंधनाची दरवाढ रोखून धरली आहे आणि एकदा निवडणुका झाल्या की ही लगेचच ही दरवाढ केली जाईल, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.