सिनेमात खलप्रवृत्तीची भूमिका वठविणाऱ्यांच्या वाट्याला शिव्याशाप येत असल्या, तरी अशा भूमिकेचा आब राखत काम करणारी मंडळीही आहे आणि यात एक प्रमुख नाव म्हणजे “अजित’. यंदाचे वर्ष हे अजित यांचे जन्मशताब्दी वर्ष. डौलदार शरीर, गॉगलमागून डोकावणारी भेदक नजर, देहबोलीतून ओघळणारा धूर्तपणा, जरब बसविणारा आवाज. एकूणच अजित यांचे रजतपटावरील अस्तित्व चीड आणणारे असे. अभिनेता अजित यांच्या जन्मशताब्दीनिमित्त.
ऐंशीचे दशक गाजविणाऱ्या अजित यांचा जन्म हैदराबादजवळ गोवळकोंडाचा. त्यांचे मूळ नाव हमीदअली खान. हणमकोंडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांना सिनेमाचे वेध लागले. पुढे देशाचे पंतप्रधान झालेले पी. व्ही. नरसिंह राव हे त्यांचे त्याकाळचे रूम पार्टनर. सिनेमाच्या आकर्षणापायी त्यांनी आपली पाठ्यपुस्तके विकून मिळालेल्या पैशांनी घरच्यांना न सांगताच मुंबई गाठली. मुंबईला येणे सोपे; पण उपजीविकेचे काय? राहायला घर नसल्याने, रस्त्याशेजारील सिमेंट पाइपमध्ये ते राहात. तिथे राहण्यासाठी हप्ता मागणाऱ्या गुंडांची धुलाई करण्यासही ते कचरले नाहीत.
सिनेमात नशीब आजमावयाचे असल्याने त्यांनी सिनेमातच ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हा संघर्ष सुरू असताना चित्रपट निर्मात्यांकडे चांगल्या भूमिका मिळविण्याचा प्रयत्नही चालू होताच. या दरम्यान प्रफुल्ल राय, गोविंद सेठी या चित्रकर्मींशी भेट झाली. ही भेट फळाला आली आणि 1946 साली पहिला सिनेमा “शाहे मिस्र’ हा रजतपटावर झळकला. गीता बोस या सिनेमाच्या नायिका होत्या. त्यापाठोपाठ जन्मपत्री, हातीमताई, जीवनसाथी, बारादरी, ऑपेरा हाऊस, बेकसूर असे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. त्या काळातील प्रमुख अभिनेत्री मीनाकुमारी, सुरैय्या, मधुबाला, नलिनी जयवंत, बीनाराय, गीता बाली आदींबरोबर पडद्यावर त्यांची जोडी जमली.
या दरम्यानच आपल्या हितचिंतकांचा सल्ला मानत त्यांनी आपले हमीद नाव वगळत “अजित’ असे नाव धारण केले. पुढे “नास्तिक’मध्ये अभिनेता म्हणून त्यांना दमदार ओळख मिळाली. या सिनेमातील “देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान’ या गाण्याची प्रासंगिकता आजही अबाधित आहे.
इतके असूनही हवी तशी स्थिरता मिळत नव्हती. नया दौर, मुघल-ए-आझम अशा सिनेमात सहकलाकाराची भूमिकाही करून बघितली; पण हाती निराशाच आली. एव्हाना अभिनेता राजेंद्रकुमार यांनी त्यांना खलनायकी भूमिका साकारण्याचे सुचविले आणि “सूरज’मध्ये भूमिका देऊ केली. “सूरज’ बऱ्यापैकी चालला; पण अजित यांना उभारी देऊ शकला नाही. त्यांनी हैदराबादला परत जाण्याचे ठरविले. तिथे त्यांना एका मांत्रिकाने सल्ला दिला की, पूर्ण पांढऱ्या पेहरावात असलेली भूमिका तुझे नशीब चमकवेल आणि तसेच घडले.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर “जंजीर’ आला, सुपरहिट ठरला. अर्ध नग्न मुली, हाती व्हिस्कीचा ग्लास, सिगारेटचा कश घेणारा हा उच्चभ्रू व्हिलन लोकांनी सहर्ष स्वीकारला. त्याच्या कृष्णकृत्यात भागीदार असलेली “मोना डार्लिंग’ तसेच “रॉबर्ट’, “पीटर’, “मायकल’ हे पात्र आजही लोकांच्या चर्चेचे विषय आहेत.
“यादों की बारात’, “कहानी किस्मत की’, “जुगनू’, “खोटे सिक्के’, “हम किसीसे कम नहीं’, “रामबलराम’ असे अनेक हिट सिनेमे केले.”कालीचरण’ मधला “लायन’ लोकांना विशेष लक्षात राहिला. “सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है’ त्यांच्या मुखी असलेला हा डॉयलॉग बराच गाजला.
वयाला न जुमानता ते तीन शिफ्टमध्ये काम करत; पण वयापरत्वे पुढे मर्यादा आल्या. शेवटची काही वर्षे त्यांनी स्वतःला सिनेउद्योगापासून दूर करून घेतले. अजित यांनी तीन लग्ने केली. पुढच्या पिढीतल्या शहजाद खानने प्रयत्न केला; पण तो सिनेसृष्टीत जम बसवू शकला नाही.
1998 साली या उमद्या कलाकाराचे हैदराबाद येथे हृदयविकाराने निधन झाले. ते नेहमी म्हणत,
जायेगा जब जहॉं से कुछ भी न पास होगा,
दो गज कफन का टुकडा तेरा लिबास होगा। अजित यांना आदरांजली.
सत्येंद्र राठी