अनेकजण हृदय हेच मन आहे, असे मानतात. हे चूक आहे. हृदयाचा आजार औषध देऊन बरा करता येतो. परंतु मनाचा आजार बरा करण्यासाठी उपचारच करावे लागतात. हृदय धडधडते, हृदय दिसू शकते; परंतु मन दिसू शकत नाही. मन धडधडत नाही. दुसरीकडे, काहीजण मेंदूलाच मन मानतात. परंतु तेही चुकीचे आहे. काहीजण इच्छाशक्ती म्हणजेच मन असे मानतात; परंतु तेही तितकेसे बरोबर नाही. मनाशिवाय कसे होईल, याचा विचार केल्याखेरीज मनाचा वापर करता येत नाही.
न के हारे हार है, मन के जीते जीत,’ ही हिंदी म्हण सर्वांनी ऐकलीच असेल. मन उदास होते; मन आनंदी होते. चांगल्या-वाईट संदेशांचा, हवामानाचा मनावर परिणाम होतो. साधक मनावर नियंत्रण मिळविण्याची कला शिकवितात. आपली स्थिती सदासर्वकाळ मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. मनाविषयीच सर्वाधिक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. मनःचक्षूंनी पाहणे, हा अनुभवही बहुतेकांनी घेतलेला असेल.
एखाद्या कामात “मन लागत नाही,’ हे वाक्यही बहुतेकांनी कधी ना कधी बोलले असेल. या पार्श्वभूमीवर कधी-कधी असे प्रश्न पडतात, की डोळ्यांऐवजी मनाने का पाहायचे? काम करावे किंवा करू नये, असे मन का सांगते? शरीरात हे मन नेमके असते कुठे? मन हा शब्द प्रत्येकाला ठाऊक आहे. इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती अशा सर्व शक्तींचा स्रोत मन हेच असते. इंद्रिये आणि मेंदूच्या माध्यमातून मनच सर्वकाही ऐकते, वास घेते, चव घेते, स्पर्शाचा अनुभव घेते. सुख-दुःखाचा अनुभवही मनालाच येतो. व्यक्ती जेव्हा बेशुद्धावस्थेत असते तेव्हा मनाचा शरीराशी संपर्क तुटतो.
अनेकजण हृदय हेच मन आहे असे मानतात. हे चूक आहे. हृदयाचा आजार औषध देऊन बरा करता येतो. परंतु मनाचा आजार बरा करण्यासाठी उपचारच करावे लागतात. हृदय धडधडते, हृदय दिसू शकते. परंतु मन दिसू शकत नाही. मन धडधडत नाही. दुसरीकडे, काहीजण मेंदूलाच मन मानतात. जगातील सर्वांत विस्तृत ब्रेन मॅप गुगलने तयार केला. यात मानवी मेंदूत असणाऱ्या न्यूरॉनच्या मध्ये असलेले जोड स्पष्टपणे दिसून येतात. या ब्रेन मॅपमध्ये 50 हजार पेशी थ्री-डी स्वरूपातही दिसून आल्या.
पेशी लाखो, करोडो टेनड्रिलशी म्हणजे वाहिन्यांशी कशा जोडलेल्या असतात, हेही हा मॅप दर्शवितो. पेशी आणि टेनड्रिल यांच्या जाळ्यातून 13 कोटी जोड तयार होतात. त्यांना साइनप्स असे म्हणतात. या ब्रेन मॅपने मेंदूच्या केवळ एक मिलीमीटर भागालाच स्पर्श केलेला आहे. एवढ्याच भागात 1.4 पेट्राबाइट डेटा असल्याचे दिसून आले आहे. हा डेटा एका संगणकाच्या सरासरी साठवणक्षमतेच्या 700 पटींपेक्षा अधिक आहे. शास्त्रज्ञ वीरेन जैन यांच्या म्हणण्यानुसार, हा ब्रेन डेटा मानवी जीनोमसारखा आहे. त्यावरील संशोधन गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे.
हार्वर्ड विद्यापीठाचे जेफ लिशमॅन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाला एका 45 वर्षीय महिलेच्या मेंदूचा एक तुकडा मिळाला, तेव्हा ब्रेन मॅपिंगचे काम सुरू झाले. या महिलेला फीट येण्याची समस्या होती. त्यामुळे तिच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मेंदूच्या ज्या भागामुळे फीट्स येत होत्या, तो भाग काढून टाकण्यात आला. परंतु हा हिस्सा काढून टाकण्याच्या प्रक्रियेत डॉक्टरांना मेंदूच्या निरोगी भागातील काही ऊतीही हटवाव्या लागल्या.
जेफ लिशमॅन यांच्या पथकाने निरोगी ऊतींच्या भागाला ताबडतोब जतन करण्याच्या रसायनात ठेवून दिले. त्यानंतर त्यात काही रंग मिसळण्यात आले, जेणेकरून प्रत्येक पेशीचे बाह्यावरण सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकेल. त्यानंतर या ऊती अशा द्रावणात टाकण्यात आल्या, ज्यामुळे त्या प्लॅस्टिकसारख्या कडक बनल्या. शास्त्रज्ञांनी नंतर त्या तुकड्याचा 30 नॅनोमीटर आकाराचा म्हणजे मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या जाडीचा भाग कापला. याच आकाराचे अनेक तुकडे करण्यात येऊन प्रत्येक तुकड्याचे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले गेले.
वीरेन जैन यांच्या पथकाने टू-डी तुकड्याचे थ्री-डी चित्र तयार केले. त्यामुळे टेनड्रिल, न्यूरॉन आदी थ्री-डी स्वरूपात दिसू लागले. आपण कितीही प्रयत्न केला, तरी मनाच्या बाबतीत असे काहीही करू शकत नाही. मनाचे कोणतेही चित्र आतापर्यंत तयार करता आलेले नाही. त्याचप्रमाणे मनावर नियंत्रण ठेवणारी शक्ती कोणती, याचाही शोध लावण्यात यश आलेले नाही. मेंदूच्या माध्यमातून शरीरावर नियंत्रण ठेवले जाते. मेंदू शरीराला आणि मनाला जोडण्याचे काम करतो. जे लोक मन आणि मेंदू एकच आहे असे मानतात त्यांच्यासाठी शास्त्रज्ञांनी असे सिद्ध करून दाखविले आहे की, मन आणि मेंदू एकच वस्तू नाही. अनेक बाबी मेंदूला आणि मनाला एकमेकांपासून विलग करतात.
काहीजण मनाला आत्मा मानतात. हेही चूकच आहे. कारण मन अनेकदा मरते. अनेकदा मन मारावे लागते. परंतु आत्म्याला आपण मारू शकत नाही. गीतेत दिलेल्या तत्त्वज्ञानानुसार आत्मा अजरामर आहे. मन आणि चेतना यांच्यातही फरक आहे. मने अनेक असतात. मन हे समाजाचे उप-उत्पादन आहे. मानसशास्त्रज्ञ मनाच्या चार प्रवृत्ती सांगतात. वर्तमान मन, अनुपस्थित मन, एकाग्र मन आणि दुहेरी मन अशा या प्रवृत्ती आहेत. व्यक्ती सातत्याने मनासोबत राहते आणि जगते.
आत्मा आपल्याला सोडून जातो, तेव्हा आपला मृत्यू होतो. आत्मा आपल्याला एकदाच सोडून जातो. परंतु मन आपली साथ सोडून अनेकदा जाते. जेव्हा मन आपली साथ सोडून जाते, तेव्हा आपण स्तब्ध, निश्चल होतो. प्रज्ञा आणि संज्ञा या शून्य नसतात. त्या एकदम व्यर्थ नसतात. मन शांत होत नाही. मौन होत नाही. तणावग्रस्त होणे, बुचकळ्यात पडणे, उत्पात घडविणे, उपद्रव करणे हा मनाचा स्वभावच आहे. मन स्वतःच एक समस्या आहे.
मन कधीच स्पष्ट होऊ शकत नाही. कारण मन हा स्वभावतःच एक गुंता आहे; अस्पष्टता आहे. जिथे मन नसेल तिथेच स्पष्टता शक्य आहे. जेव्हा मन नसेल तेव्हाच मौन शक्य आहे. त्यामुळेच मन शांत राहील, अशी अपेक्षा कधीही करता कामा नये. ध्यानधारणा, समाधी आणि विपश्यनेच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळविण्याची कला आपल्याला कित्येक वर्षांपासून शिकविली जात आहे. परंतु कोणीही यात पारंगत होऊ शकलेले नाही. जो यात पूर्ण पारंगत झाला तो इहलोकीच्या व्यवहारांसाठी योग्य राहिला नाही.
आपल्या आसपास जे काही घडते आहे, त्याची पाळेमुळे मनात रुजलेली आहेत. मनच सदैव प्रत्येक विचाराचे आणि घटनेचे कारण ठरत असते. काही क्षणांसाठी जरी मन थांबले, आपल्याला क्षणभर जरी असे वाटले की आपल्याला मनच नाही, आपले मन संपून गेले आहे, वितळून गेले आहे, वाफ बनून उडून गेले आहे, आता आपण केवळ एक शुद्ध अस्तित्व, एक श्वास, एक हृदयाची धडधड, पूर्णतेच्या क्षणात आहोत, आपल्याला ना भूतकाळ आहे ना भविष्य, तर आपण वर्तमानातही राहू शकत नाही.
मनाविना कसे होईल, याचा विचार आपण जोपर्यंत करू शकत नाही, तोपर्यंत मनाचा वापर करू शकत नाही. मनाविना जग आपल्यासाठी कसे असेल, याचा विचार जे लोक करू शकतात, तेच मनाचा वापर करण्यास सक्षम होतात. अन्यथा मनच आपला वापर करीत राहते. किंबहुना जे आपला वापर करीत आहे, ते आपले मनच आहे. परंतु ते खूपच चलाख आहे. ते आपली समजूत घालत राहते की, आपण त्याचा वापर करीत आहोत.
मन मालक बनले आहे आणि आपण त्याचे गुलाम आहोत. मन असा एक हिस्सा आहे, जो आपला नाही. दिलेला आहे. उत्पन्न केलेला आहे. घडविला गेलेला आहे. मनाचा जो अर्थ समाजाने आपल्यात भरला आहे, तेच मन आहे. मन म्हणजे आपण नाही आहोत. मन असल्यामुळेच मनोवृत्ती आहेत. मनोविकार आहेत. मनाच्या गतीला कोणतीही मर्यादा नाही. एका क्षणात मन कुठूनही कुठपर्यंतही प्रवास करू शकते.
ते स्वप्न विणू शकते. ते स्वप्नात रंग भरू शकते किंवा ते स्वप्न कृष्णधवलही ठेवू शकते. कोणत्याही कलेसाठी मन हवे. विस्तृत मन हवे. प्रेमासाठी मन हवे. संवेदनशील मन हवे. काहीही करायचे किंवा सोडायचे असेल तरी मन हवे. या संदर्भाने अनेकजण इच्छाशक्ती म्हणजेच मन असे मानतात. परंतु तेही खरे नाही. इच्छा मनात एकाएकी उत्पन्न होते. इच्छा तृप्तही होतात आणि अतृप्तही राहतात. परंतु मनाचे तसे होत नाही.
ते जसे सांगते तसे आपल्याला करायलाच लागते. परंतु इच्छांचे तसे होत नाही. काही खाण्याची इच्छा झाली तर आपण ती दूरही ठेवू शकतो. परंतु आपले मन जर तो पदार्थ खाऊ इच्छित असेल, तर आपण ती सोडू शकत नाही. आनंद आणि दुःखाचे चित्रही मनच रंगविते. मन ही आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. आपली संज्ञा आणि विशेषण यांच्या पूर्णत्वाचा आधारही मनच बनविते. तयार करते. चित्तवृत्तींचा विरोध मनाविना होऊ शकत नाही. ही एक शक्ती आहे; ताकद आहे. आपला कमकुवतपणाही मन हाच आहे. म्हणूनच कबीरांनी “मन का फेरा’ लिहिले आहे.
– योगेश मिश्र