Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यभरात विरोध दर्शवण्यात येत आहे. या विधानानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांनी असे बोलायला नको होते असे ट्विट केले होते. त्यावर आव्हाड यांनी “रोहित पवार हे लहान असून ते आमदार म्हणून नवखे आहे, त्यांना मी फार महत्त्व देत नाही,” असे म्हटले होते. दरम्यान, परदेशात गेलेले रोहित पवार आज महाराष्ट्रात आले असून त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीवर आपली भूमिका मांडली.
आज पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी, “इतिहासात काय घडले, हे मला माहीत नाही. देव, धर्म हा वैयक्तिक विषय आहे. मी लहानपणापासून देवळात जातो. देव, धर्मावर जेव्हा कुणी राजकीय प्रतिक्रिया द्यावी, हेच भाजपाला हवे असते. आज बेरोजगारी, महागाई सारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील मोठे मोठे प्रकल्प राज्याबाहेर आणि गुजरातमध्ये जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न उग्र बनले आहेत. त्यावर सरकारकडून कोणतेही भाष्य केले जात नाही आणि अशावेळी जेव्हा आव्हाड यांनी देव-धर्मावर विधान केले, तेव्हा सरकारला आयता विषय मिळाला. सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच विषयावर आंदोलन करताना दिसतात. धर्म हा व्यक्तिगत विषय असून त्यावर जाहीर बोलू नये, याचा फायदा भाजपाला होत आला आहे.”” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे रोहित पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत, “मला जे योग्य – अयोग्य वाटते, ते मी बोलून दाखवितो. मी मनात वेगळे आणि मुखावर वेगळे ठेवत नाही. आव्हाड यांचे वक्तव्य या वातावरणात योग्य वाटले नाही, म्हणून मी बोलून दाखविले. त्यानंतर माझ्याबद्दल ते स्वतः बोलले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे”, असेही यावेळी रोहित पवार यांनी स्पष्ट सांगितले.
ईडीच्या कारवाईवर बोलताना रोहित पवार यांनी, काल सकाळी माझ्या कंपनीवर कारवाई झाली आणि मी संध्याकाळी भारतात आलो. काही चूक असते तर मी आलोच नसतो. याआधी ज्यांच्या ज्यांच्यावर अशी कारवाई झाली, तेव्हा ते दिल्लीला तरी गेले किंवा त्यानंतर सत्ताबदल झालेला आपण पाहिला. मी अजिबात घाबरलेलो नाही आणि याबाबत सहानुभूतीही घेत नाही. ईडीच्या अधिकाऱ्याना ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याप्रमाणे ते येतात आणि तपास करून जातात. पण ईडी आणि आमच्यातील काही गोष्टी माध्यमात कशा आल्या? हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. यावरूनच काही लोकांना यात राजकारण करायचे आहे, असे दिसते.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.