आंबेठाण -चाकण-आंबेठाण रस्त्याच्या काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. बिरदवडी येथे रस्ता तयार करताना पाण्याचा वापर होत नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. धुळीचे लोट घरात घुसत असल्याने अनेकांनी घरे झाकून घेतली आहेत. तर धुळीचे कण स्थानिकांच्या नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व घशाचा त्रास सुरू झाला आहे.
चाकण-आंबेठाण रस्त्याचे कामे कित्येक दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे.
संबंधित कंत्राटदारांने पूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या वापर न करता मुरूम दबाई करण्यात येत असल्याने धुळीचे मोठे लोट उठत आहे. डोळ्यात धूळ गल्याने एका पाठोपाठ चालणारी वाहने दिसेनाशी होऊन अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर हा मार्ग खडतर झाला आहे. रस्त्यावर पाण्याचा वापर करूनच दबाई करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
जड वाहनांमुळे दिवसभर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरात धूळ घुसत आहे. त्यामुळे घरातील उपकरणे, सोफा, दिवाण आदी साहित्य खराब होत आहे. धुळीचे कण नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व घसा दुखण्याच्या त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अनेकांनी घरे ताडपत्रीने झाकून घेतली आहेत. स्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून काही महिने उलटून गेले तरी, पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्ता करायचा नव्हता तर, रस्ता उखडून ठेवला कशाला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.