तळेगाव दाभाडे- सोमाटणे येथील टोलनाका बेकायदेशीर असून तो बंद करावा, अशी मागणी जनसेवा विकास समितीने केली आहे. “टोलनाका हटाव’च्या मागणीसाठी मंगळवारी (दि. 14) सोमाटणे येथे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अखेर आंदोलनकर्त्यांची मागणी तात्पुरती मान्य करीत चारचाकी वाहनांकडून टोल न घेण्याचा निर्णय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोल नाका बेकायदेशीर असून तो हटविण्यात यावा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. त्यासाठी जनसेवा विकास समितीने पुढाकार घेत गुरुवारी (दि. 9) सर्वपक्षीयांकडून तळेगाव बंदची हाक दिली. हा बंद यशस्वी झाल्यावरही शासनाकडून टोलबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे आणि इतर सहा जणांनी आमरण उपोषण सुरू केले. मात्र या उपोषणाकडेही शासनाने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे सोमवारी रात्री समितीच्यावतीने निर्णय जाहीर करण्यात आला की सोमाटणे टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन करायचे.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनीही वाहन चालकांची अडवणूक होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची तयारी केली. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आंदोलनकर्ते सोमाटणे टोलनाका येथे जमण्यास सुरवात झाली. प्रमुख नेते आल्यावर सकाळी साडेदहा वाजता रास्तारोको आंदोलनाला सुरवात झाली. जवळपास तीन हजारांहून अधिक नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली
दरम्यान आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून वडगाव फाटा व लिंब फाटा येथून वाहतूक तळेगाव चाकण महामार्गावर वाहतूक वळवली होती. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच याठिकाणाहून आंदोलनाच्या ठिकाणी जाणाऱ्यांना पोलिसांनी अडविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी संबंधितांना सूचना दिल्यावर आंदोलकांची वाहने सोडण्यात आली.
विधिमंडळातही आंदोलनाचे पडसाद
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सोमाटणे टोलनाका हटाव यासाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. लवकरच याबाबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
चारचाकी वाहनांना टोल नाही
सोमाटणे टोलनाका हटविण्याबाबत कायमस्वरूपी निर्णय होत नाही तोपर्यंत सोमाटणे टोलनाक्यावरून चारचाकी वाहनांना टोल आकारण्यात येणार नाही, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
तीन दिवसांचे उपोषण सोडले
सोमाटणे टोल नाका हटाव या मागणीसाठी किशोर आवारे, सुशील सैंदाणे, राजेंद्र जांभुळकर, निलेश पारगे, योगेश पारगे, जमीर नालबंद व प्रशांत मराठे यांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चारचाकी वाहनांना टोल आकारणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत उपोषण सोडले.
पोलीस प्रशासनही सज्ज
मावळ तालुक्यातील जनआंदोलन हे पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असते. त्यामुळे सोमाटणे टोल नाका हटविण्याच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यामध्ये एक एसआरपीची तुकडी, दोन स्ट्रायकर फोर्स पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि साध्या वेषातील पोलिसही तैनात होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी दिली.