ऋषीपंचमी! याचा अर्थ असा की, या दिवशी ऋषीमुनींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते.
ऋषीपंचमी! या दिवशी अरूंधतीसोबत सप्तर्षीची पूजा करण्याचा रिवाज आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून असे दिवस साजरे करण्याची पद्धत आहे. ज्याप्रमाणे मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यांसारखे दिवस साजरे करून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपण विचार करत नाही, मोठ्या उत्साहाने आनंदाने आपण हे दिवस साजरे करतो; परंतु खूप विचार केला तर आज साजरे होणाऱ्या डेज जे मूळ आपल्याच संस्कृतीत आढळून येते. ऋषीऋण, देवऋण आणि पितृऋण असे तीन प्रकारचे ऋण आपल्या संस्कृतीत मानले जाते. ऋषी, देव, पिता हे आपले गुरू आहेत. पित्याची सेवा करून, देवाची भक्ती करून हे ऋण फेडता येते. ऋषीऋण फेडताना आपण ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून, पूजन करून अंशत: फेडू शकतो. समाजजीवन योग्यरितीने चालण्यासाठी चार आश्रमांचे नियोजन केले गेले. त्यामध्ये राजाकडे राज्यकारभार संरक्षण हे कर्तव्य होते. तसेच समाजाचे पोषण संरक्षणवर्धन हे ऋषींकडे आलेले कर्तव्य होते. ते त्यांनी उत्तमरीत्या पार पाडले असल्याचे दिसून येते.
श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषीपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषीपंचमी साजरी केली जाते.
पूर्वी आश्रमशाळा म्हणजे गुरूकुल शिक्षण पद्धती होती. गुरूकुलात शिकताना राजपुत्र, ब्राह्यणपुत्र असा भेदाभेद नव्हता. शिष्य हा फक्त शिष्यच समजला जात असे. तिथे हा मोठा, हा छोटा असा भेदभाव नसायचा. गुरूकुलात सर्व कामे सर्वांना सारखीच होती. गुरूपत्नी मातेसमान असे. आपण माणूस आहोत. आपल्यातही काही अवगुण आहेत, दोष आहेत, आपल्याही हातून काही चुका होऊ शकतात याची जाणीव ऋषींना होती. म्हणून गुरू शिष्याला स्वगृही पाठविताना, ज्ञानार्जन करून परत जाणाऱ्या आपल्या शिष्यांना उपदेश करताना सांगत असतं “”आमची जी योग्य कर्मे किंवा सद्गुण आहेत, त्याचाच स्वीकार करा! आणि तीच कर्मे आचरणात आणा! अयोग्य कर्मांचे म्हणजे अवगुणांचे, चुकांचे कदापि अनुसरण करू नका! स्वत:चे दोष मान्य करण्याइतका मोकळेपणा, स्पष्टपणा या ऋषींकडे होता. त्याकाळापासून समोरच्याला माणूस म्हणून माना, देव समजून त्यांची पूजा करू नका असा संदेश दिला जायचा.
मागे पाहू जाता, ऋषीमुनी जरी आश्रमवासी होते, अनासक्त होते तरीही समाजशील होते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. राष्ट्र, राज्य, प्रजा सर्व दृष्टीने संपन्न राहील, निरोगी राहील, याचा विचार सातत्याने ते करीत असत. राजा जर काही कर्तव्यात चुकत असेल तर वेळीच सावध करण्यास ऋषीमुनी कचरत नसत. राजासुद्धा त्यांना योग्य तो मान देत असे. त्यांचा सल्ला मानत असे.
केवळ राष्ट्र संपन्न होणं हाच उद्देश नाही तर वैचारिकदृष्ट्या राष्ट्र-राज्य समृद्ध करण्यासाठी त्यांनी कष्टांची आणि त्यागाची मोठी परंपरा निर्माण केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पुराणग्रंथातून सापडतात. या ऋषीपरंपरेतील एक असलेल्या दधिची ऋषींची कथा महत्त्वपूर्ण आहे. असुरांबरोबरच्या युद्धात देवांचा पराभव झाला तेव्हा त्यांचा पाठलाग असूर करीत असताना देवांनी आपले अस्त्रे त्यांच्या हाती लागू नये म्हणून दधिची मुनींच्या आश्रमात टाकली. ती अस्त्रे मुनींनी गिळून टाकली. वृत्रासूर नावाचा असूर अजिंक्य बनला तेव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी लागणारी अस्त्रे दधिचींच्या हाडापासून तयार करावी, असा उपदेश विष्णूंनी केला. क्षणाचाही विचार न करता दधिचींनी योगाच्या माध्यमातून देहत्याग केला. त्यांच्या हाडापासून इंद्राने वज्र तयार केले आणि त्या वज्राने वृत्रासूराचा वध झाला. धन्य ते दधिची ऋषी. संसारातून विरक्त झाले किंवा रमले तरी क्षणकालासाठी त्यांना सामाजिक बांधिलकीचा किंवा राष्ट्राच्या संरक्षणाकरिता आपला जन्म आहे याचा विसर पडला नाही. ते स्वतः एक योद्धा, समाजकर्ता होते. त्यांच्या योगसामर्थ्याची त्यांना जाणीव होती. मात्र, आपले सामर्थ्य त्यांनी नेहमीच समाजासाठी, राज्यासाठी पणाला लावले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अगस्ती ऋषी.
या शब्दाचा अर्थच मुळी अंगपर्वतं स्तभयति असा आहे. अंग म्हणजे पर्वत, ज्याने पर्वताला थांबविले ते अगस्ती ऋषी. असे म्हणतात दक्षिणेचा भाग अरण्यांनी आणि राक्षसांनी व्यापलेला होता. विंध्य पर्वत हा दिवसागणिक वाढत होता. तो वाढला असता, उंच झाला असता तर भारताच्या हवामानावर विपरीत परिणाम झाला असता. अशा वेळी अगस्ती मुनी तिथे गेले. विंध्य त्यांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकला. तेव्हा आशीर्वाद देऊन “आता वाकलेल्या अवस्थेत राहा मी परत येईपर्यंत’ असे त्यांनी सांगितले; पण मुनी वापस आले नाहीत. परिणामी, विंध्य तसाच राहिला. त्याची वाढ झाली नाही आणि आपला देश पर्यावरण संपन्न राहिला. इथे ही रूपककथा असली तरी त्यातून आगस्ती ऋषींची कळकळ दिसून येते. म्हणूनच “ऋषीपंचमी’ ही त्यांच्या कृतज्ञतेकरिता साजरी करावी. यामागील धार्मिक कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. विदर्भात ऋषीपंचमी श्री गजानन महाराजांचा निर्वाणदिन म्हणून साजरा करतात. याच दिवशी महाराज समाधिस्थ झाले म्हणूनही ऋषीपंचमी महत्त्वाची मानली जाते.
आपले ऋषीमुनी हे सर्वज्ञानी होते. त्यांना सर्व शास्त्रांचे ज्ञान होते. शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जलशास्त्र, भाषाशास्त्र संगीत, राजनीती अशा विविध विषयांचा सांगोपांग अभ्यास करून त्यांनी आपली संस्कृती आणि साहित्यसंपदा समृद्ध केली. इतकेच नव्हे तर महाभारत, रामायण यांसारखी महाकाव्ये आणि चारही वेद निर्माण केले. अशी एकही शाखा नाही किंवा विषय नाही ज्याचे संदर्भ आपल्याला त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथातून मिळत नाहीत. ऋषीमुनींनी प्रत्यक्ष राज्य चालविले नसले तरी योग्य वेळी योग्य सल्ला देण्याचे अनमोल कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांच्या विचारमंथनातून तयार झालेले भारतीय तत्त्वज्ञान जगात आजही श्रेष्ठ मानले जाते. अशा या थोर विभूतींना स्मरण करून ऋषीपंचमीला त्यांना कृतज्ञता अर्पण करूया!